आणि आमच्या चुका आम्ही निस्तरणार आहों अशा रगदार, व स्वाभिमानी भावनेची जोपासना त्यांच्या ठाय निश्चित होईल; आणि मग ब्राह्मणब्राह्मणेतरवादाचें मूळच उपटल्यासारखे होऊन आपला समाज एकसंघ होण्याची आशा धरतां येईल. यायोगे आणखीहि एका दृष्टीने प्रगति होण्याचा संभव आहे. जातिभेद नष्ट व्हावा व सर्व महाराष्ट्रीय समाज एक रक्ताचा व्हावा अशा तऱ्हेचें तत्त्वज्ञान सध्यां प्रसृत होत आहे. ब्राह्मणब्राह्मणेतरांतील कटुता कमी होऊन हे दोन समाज जवळ आले तर त्या तत्त्वज्ञानाला जोर व वेग प्राप्त होऊन कदाचित् ते प्रत्यक्षांत येण्याची आशा निर्माण होईल.
ब्राह्मणब्राह्मणेतर या विषयाचे विवेचन येथे संपले, आपला सर्वच समाज, त्याचे सर्वच घटक विषमतेच्या, संकुचित दृष्टीच्या रोगानें ग्रस्त आहेत आणि येथल्या प्राचीन काळच्या व आतांच्याहि उत्कर्षाची व अधःपाताची जबाबदारी सर्वांवरच आहे, श्रेयाप्रमाणे अपश्रेयाला सर्वच भागीदार आहों, अशी या विवेचनामागली भूमिका आहे. ती मान्य झाल्यास येथले बरेचसे प्रश्न सुटतील आणि भारतीय लोकसत्ता यशस्वी होण्याची शक्यता निर्माण होईल असे वाटते.
स्वातंत्र्याच्या उत्तरकाळांत एकंदर भारतीय जीवनाची पुनर्घटना करण्याचे प्रयत्न काँग्रेसनें व इतर कार्यकर्त्यांनी सुरू केले. त्यांपैकी राजकीय व आर्थिक पुनर्घटनेच्या प्रयत्नांच्या यशापयशाचे मोजमाप आपण प्रथम केले आणि त्यानंतर आतां सामाजिक पुनर्घटनेचा प्रश्न विचारार्थ घेतला आहे. मागें जागोजागी अनेक वेळां हे सांगितले आहे कीं, धर्म, पंथ, जाति, वर्ण,