पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(ब्राह्मणब्राह्मणेतर वाद)

 ब्राह्मण ब्राह्मणेतर वादांत हिंदुस्थानांत वेदकालापासून जे जे अनर्थ झाले त्या सर्वांना ब्राह्मणच जबाबदार आहेत, हा सिद्धान्त प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणेतर पंडितांनी जी इतिहासमीमांसा केली ती क्षत्रियांना व एकंदर ब्राह्मणेतर समाजालाच कशी अवमानकारक आहे हे वर सांगितले. त्याचप्रमाणे तो इतिहासमीमांसा पत्करल्यामुळे इंग्रज हाच आपला उद्धारकर्ता आहे, या देशांतलें ब्राह्मणीधर्माचे वर्चस्व मोडणें आपल्याला शक्य नाहीं, इंग्रजी राज्यकर्ते मात्र ते मोडूं शकतील, म्हणून त्यांचें राज्यच येथें टिकले पाहिजे, आपण त्यांच्या साम्राज्याचे दोस्त झाले पाहिजे, नाहीं तर स्वराज्यप्राप्ति होतांच पुन्हां ब्राह्मणी राज्य प्रस्थापित होईल, असा ब्राह्मणेतरांचा बुद्धिनिश्चय झाला व १९३० सालापर्यंत ते स्वातंत्र्याच्या लढ्यापासून अलिप्त राहिले. इतकेच नव्हे, तर ब्रिटिशराज्यविरोधी चळवळी या देशाला विघातक होतील असें त्यांनी मानिले, हाहि विचार वर ब्राह्मणेतर पंडितांच्या वचनांच्या आधारेंच सांगितला.
 मला अशी खात्री वाटते की नव्या पिढीच्या ब्राह्मणेतर समाजाला ही विपरीत इतिहासमीमांसा, स्वतःलाच अत्यंत अवमानकारक असें हें पूर्वइतिहासाचें भाष्य आणि त्या भाष्यामुळेच पत्करलेला दुसरा सिद्धान्त- इंग्रज जातांच येथें ब्राह्मणी राज्य प्रस्थापित होईल हा सिद्धान्त- मान्य होणार नाहीं. आणि तसे झाल्यास दुही माजविणे, जन्मनिष्ठ उच्चनीचतेचा पुरस्कार करून इतरांना हीन लेखणे, आपली विद्या इतरांपासून लपवून ठेवणें, हे जे दोष आहेत ते आपल्या समाजाच्या सर्वच जातींत, जमातींत, वर्गांत आणि वर्णात आहेत, त्यांतून मुक्त असा कोणीहि नाहीं, हा इतिहाससिद्ध विचार त्यांना पटण्याचा संभव आहे. तसे झाल्यास ब्राह्मणब्राह्मणेतरवादाचें मूळच उपटल्यासारखे होईल. म्हणून त्या दृष्टीनें थोडी इतिहासचिकित्सा आतां करावयाची आहे.