पान:भारतीय लोकसत्ता.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२७
औद्योगिक पुनर्घटना

आपल्याला यश आलें हेच आपले भाग्य आहे, हे म्हणणे त्यांना पटू लागेल. अशा स्थितींत या थोर पुण्याईवर किंचित् काळ आलेले मालिन्य पाहून त्यांनी तिच्या प्रभावी सामर्थ्याचा विसर पडूं देऊं नये. त्यांत आत्मघात आहे. लोकशाही यशस्वी होण्यास स्थिरशासन, परचक्रापासून संरक्षण व अंतर्गत शांतता यांची जरूर असते. गेल्या शंभर दीडशे वर्षांत ज्यांनीं ज्यांनीं लोकसत्तेचे प्रयोग केले त्यांच्यापैकी एकालाहि हें सिद्ध करतां आलें नाहीं. काँग्रेसच्या म्हणजे दादाभाई, रानडे, गोखले, टिळक, महात्माजी, सुभाषचंद्र, मालवीय, मोतीलाल, लजपतराय यांच्या आणि त्याचप्रमाणे राममोहन, लोकहितवादी, ज्योतिबा फुले, विष्णुशास्त्री, आगरकर, विवेकानंद यांच्या पुण्याईनें हें या देशांत सिद्ध झाले आहे. राष्ट्रपति राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलालजी, सरदार वल्लभभाई यांच्या कर्तबगारीने ते अजून टिकून राहिले आहे. लोकशाही सिद्ध करण्यास ही एक अपूर्व संधि आपणांस लाभली आहे. अशा वेळी काँग्रेसमध्ये शिरून या महान् प्रयोगांत या देशांतील तरुण कार्यकर्ते सामील होतील, व ध्येयनिष्ठा, चारित्र्य व त्याग या धनाची पुन्हां समृद्धि करतील, तरच औद्योगिक पुनर्घटना, राष्ट्रीयीकरण, आर्थिक समता इ. या भूमीची स्वप्न साकार होतील. काँग्रेस अधोगामी आहे, नीतिभ्रष्ट आहे असे म्हणून आपण दूर उभे राहिलो तर हा प्रयोग अयशस्वी होण्याची सर्व जबाबदारी आपल्यावरच येईल, हे तरुणांनी विसरू नये.



प्रकरण बारावें
सामाजिक पुनर्घटना
ब्राह्मणब्राह्मणेतर वाद
(१)

 लोकसत्ता ज्या समाजांत यशस्वी व्हावयाची तो समाज संघटित, अभग्न, एकसंध असा असणे अवश्य आहे. त्या समानांत अनेक भिन्न घटक असले