पान:भारतीय लोकसत्ता.pdf/१४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१३
जनता जागृति


चंपारण्यांतील क्रांति

 चंपारण्यांतील गरीब शेतकऱ्यांची स्थिति आफिकेंतल्या मजुरांपेक्षां फारशी निराळी नव्हती. लोकायत्त शासनाच्या नागरिकत्वापासून म्हणजेच 'लोकत्वा' पासून ते शेतकरी त्या मजुराइतकेच दूर होते. साध्या मनुष्यत्वाशी सुद्धा त्यांची ओळख शिल्लक राहिली नव्हती. गोरे मळेवाले त्यांना भाल्यांनीं मारीत, गोळ्या घालीत, जाळून टाकीत. त्यांचे अन्न, त्यांचे वस्त्र आणि त्यांच्या नववधूहि हिरावून नेत. हा किळसवाणा जूलूम अनेक पिढ्या चालू होता, या अवधींत त्या शेतकऱ्यांनी चारपांच वेळां दंगे केले हे खरे. पण ते दंगे होते. ते संग्राम नव्हते, ते लढे नव्हते. दंग्यांनी मानवाची उंची वाढत नाहीं. दंगा हा जड, शारीर उद्रेक आहे. त्याचा मनोबलाशीं, तत्त्वज्ञानाशी संबंध नसतो. म्हणून त्यांतून सद्गुणांची निपज होत नाहीं. ती संग्रामांतून होते. कारण त्याच्यामागें तत्त्वज्ञानाची अढळ बैठक असते. तत्त्वज्ञान म्हणजे मानवाच्या विशाल व उन्नत आकांक्षांचे समर्थन माझ्या एकटयाचे सुख किंवा दुःखमुक्तता ही अल्प आकांक्षा आहे. मजसारख्या शेकडो बांधवाचें सुख, स्वातंत्र्य, त्यांची उन्नति ही मोठी आकांक्षां आहे. तिलाच तत्त्वज्ञानाचें रूप येते. आणि तिच्या मोठेपणामुळेच तिच्या प्रेरणेनें निष्ठा, त्याग धैर्य हे गुण निर्माण होऊन व्यक्तीच्या मनःसामर्थ्याचा विकास होतो. मानवाचे हे मनःसामर्थ्य हाच लोकसत्तेचा पाया आहे. महात्माजी जेथें जात तेथील सामान्य जनतेच्या मन:सामर्थ्यांचा आविष्कार घडवून आणीत. चंपारण्यांतील शेतकरी गोऱ्या मळेवाल्याचा नुसता जमादार आला तरी घाबरून जात, लपून बसत. पण महात्माजी तेथे जातांच ते निर्भय झाले व त्या मळेवाल्यालाच आव्हान देण्यास सिद्ध झाले. या जागृतीमुळे तेथे अगदीं अल्प अवधीत कल्पनातीत यश आले. चंपारण्यांत १५ एप्रिल १९१७ या दिवशीं महात्माजींनीं पाऊल ठेवले आणि २९ नोव्हेंबर १९१७ रोजी विधिमंडळांत चंपारण्य ॲग्रेरियन बिल मांडले गेले व त्यामुळे तेथील सर्व अन्याय नष्ट झाला. तो इतका की, अन्यायावरच जगत असलेल्या गोऱ्या मळेवाल्यांना थोड्याच वर्षात तेथील जमिनी व कारखाने विकून तोंड काळें करावे लागले.