उभें करावें, कारण त्यावांचून लोकसत्ता क्षणभरहि टिकणार नाहीं, हे जाणून या सर्वांची संघटना करण्यासाठीं त्यानीं जिवापाड मेहनत घेतली. हिंदूप्रमाणेच मुसलमान, पारशी, खिस्ती यांना त्यांनी या संघटनेत ओढून आणले. श्रीमंत व मध्यम यांच्याप्रमाणेच शेतकरी व कामकरी यांचा राष्ट्रसभेंत रिघाव घडवून आणला. बंगाल, मद्रास, पंजाब, महाराष्ट्र यांच्याप्रमाणेच सिंधरजपुतान्या- सारख्या मागासलेल्या प्रांतांतहि दौरे काढले आणि या सर्वांना बहिष्कार- योगाचं तत्त्वज्ञान सांगून त्याचा प्रत्यक्ष आचार करण्याइतके सामर्थ्य, निर्भयता व त्याग त्यांच्या ठायीं निर्माण केला. या त्यांच्या प्रयत्नांमुळे वर्षाकालांत ज्याप्रमाणे पर्वताच्या पहाडांतून, दऱ्याखोऱ्यांतून, जमिनीच्या गर्भातून सर्वत्र पाण्याचे उमाळे बाहेर येतात त्याप्रमाणे अखेरीस या भरतभूमीच्या सर्व प्रांतांतून प्रतिकारशक्तीचे उमाळे येऊ लागले व आंतून स्फुरणाऱ्या या अहंकाराच्या चैतन्यामुळे ही मागासलेली जनता एका अत्यंत मदांध व धुंद अशा साम्राज्यसत्तेशीं काळझुंज घेण्यास उभी राहिली. टिळकांनी हे पाहिले; त्यांच्या चित्ताचें समाधान झाले; आणि त्या समाधानांतच तीन तपाच्या अविरत कष्टांनी जर्जर झालेला आपला देह अखेरच्या विश्रांतीसाठी त्यांनी भूमीवर ठेविला.
लोकमान्य टिळक व महात्मा गांधी या दोन पुरुषांमध्ये अंतिम ध्येय, तत्त्वज्ञान व कार्यपद्धति या दृष्टींनी कितीहि फरक असला, तरी भरतभूमीच्या उद्धारार्थ कोणच्या शक्तीला आवाहन करावयाचे याविषयीं त्यांच्यांत मतभेद नव्हता. सामान्य जनता हेंच राष्ट्रशक्तीचे मूलस्थान आहे, भावी काळांतील सर्व संग्राम याच शक्तीच्या जोरावर करावयाचे आहेत आणि ही शक्ति एकदां जागृत झाली म्हणजे राजे, सेनापति, सरदार इत्यादि जुनाट शक्तींना