Jump to content

पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लिहितो की बृहन्मानसाचा कर्ता मनु नांवाचा होता. यावरून वरील श्लोकाचा अर्थ 'एक लघुमानस करून दुसरें लघुलघुमानस (लघुपूर्वं अन्यल्लघुमानसं ) मुंजालाने केलें । असा की काय न कळे. वरील आर्या मुंजालाच्या दुस-या मानसकरणांत असतील किंवा कदाचित् बृहन्मानसाचा कर्ता मुंजालच असेल, व त्यांत त्या असतील. लघुमानसांत शकगत ८५४ चैत्र शुक्ल १ रविवार मध्यान्हींचे क्षेपक आहेत. अहर्गणावरून ग्रहसाधन आहे. मध्यम, स्पष्ट, तिथि, त्रिप्रश्न, ग्रहयुति, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, शृंगोन्नति, असे ८ अधिकार आहेत. मुंजाल हा भारद्वाजगोत्री ब्राह्मण होता, असें वरील श्लोकांत आहे. अयनगतीचा स्पष्ट उल्लेख मुंजालाच्या पूर्वीच्या कोणत्याही उपलब्ध पौरुष ग्रंथांत नाही ही गोष्ट फार महत्वाची आहे. मुंजालाने स्पष्ट चंद्रास इतर ग्रंथांत नसणारा एक विशेष संस्कार सांगितला आहे. यावरून मुंजाल हा एक विलक्षण शोधक आणि कल्पक होऊन गेला असे दिसते. काशीराजकीय पुस्तकालयांत सोदाहरण लघुमानस पुस्तक खंडित आहे. त्यांत उदाहरणांत शक १४९४ आहे व ध्रुवक शक १४०० चे आहेत. चरादिक संस्कार कांपिल्यनगरचे आहेत. या टीकेचा कर्ता आर्यभटीयटीकाकार परमेश्वर हा असावा, कारण 'लघुबृहन्मानसावर टीका केली आहे, असे त्याने आर्यभटीयटीकेंत लिहिले आहे, असें सुधाकर ह्मणतात. परंतु ते संभवनीय नाहीं; कारण परमेश्वर हा मलबारांतला असावा, असे मला वाटते. लघुमानसकरण शक १५०० पर्यंत कोठे कोठे प्रचारांत होते असें वरील उदाहरणावरून दिसते. आर्यभट दुसरा-बेरुणीच्या पूर्वी हा झाला असें वर दाखविलेंच आहे. (पृ. ३१० टीप.) पृथुस्वामी-पृथूदकस्वामी हा ज्योतिषग्रंथकार आहे, परंतु त्याच्या ग्रंथाचें नांव वगैरे कांहीं समजले नाही, असें बेरुणी लिहितो. यावरून पृथुस्वामीचे टीकाग्रंथ बेरुणीच्या वेळी निदान सिंधप्रांतांत तरी प्रसिद्ध नव्हते असे दिसते. कुसुमपुरचा आर्यभट याच्या ग्रंथांतला ह्मणून एक उतारा बेरुणीने दिला आहे. त्यांत " कुरुक्षेवाचें उज्जनीपासून देशांतर १२० योजनें पृथुस्वामी धरितो" असें आहे. दोघां आर्यभटांपैकी कोणाच्याही ग्रंथांत पृथुस्वामीचें नांव नाही. यावरून आर्यभटग्रंथाच्या टीकेंतला सदरहू उतारा असावा. (टीकेंतला मजकूर मूळग्रंथांतला अशी बेरुणीची समजूत झालेली बरेच स्थली दिसते.) बेरुणीच्या पूर्वीचा हा टीकाग्रंथ होय, व त्याच्या पूर्वीचा पृथुस्वामी होय. यावरून त्याचा काल सुमारे शक ८५० पासून ९०० पर्यंत असावा. भटोत्पल-याचे जे ग्रंथ मागें (पृ. २३५) मी सांगितले आहेत त्यांशिवाय आणखी ग्रंथ बेरुणीने लिहिले आहेत. ते असेः-राहुनाकरण आणि करणपात हे दोन करणग्रंथ आणि बृहन्मानस ग्रंथावरील टीका. यांत करणग्रंथांची नांवें चमत्कारिक दिसतात. व एकाच ग्रंथकाराचे दोन करणग्रंथ असणे संभवत नाही. यावरून बेरुणीच्या समजुतींत कांहीं चूक झालेली दिसते. श्रूधव या नांवाचा उत्पलाचा आणखी ग्रंथ होता असें तो ह्मणतो. या नांवांत कांहीं चूक दिसते. या ग्रंथांतली कालादिकांची मानें बेरुणीने सांगितली आहेत. श्रूधव नांवाचे आणखीही ग्रंथ आहेत