पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४

आले. ह्यांच्या मदतीनें बायजाबाईसाहेबांनीं राज्यांत अनेक सुधारणा केल्या व प्रजेस फार सुख दिलें. बाईसाहेबांच्या कारकीर्दीचे अस्सल कागदपत्र अद्यापि उपलब्ध झाले नसल्यामुळें त्यांच्या राज्यकारभाराची सविस्तर हकीकत देतां येत नाहीं. तथापि जी त्रोटक माहिती मिळाली आहे, तेवढ्यावरून बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दींत ग्वाल्हेर संस्थानांत ज्या सुधारणा झाल्या, त्यांचा संक्षिप्त उल्लेख करण्यास हरकत नाहीं.

 बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दींत देशामध्यें बरीच शांतता झाली. त्या वेळची देशस्थिति सांप्रतच्या देशस्थितीहून फार भिन्न होती. त्या वेळीं प्रत्यक्ष रणभूमीवर अनेक पराक्रम गाजविलेलें व युद्धाकरिता आणि लुटीकरितां सदैव उत्सुक असलेले सैन्य फार होतें. त्यास आपल्या ताब्यात ठेवून त्याच्याकडून प्रांताचा बंदोबस्त करविणें व परचक्रापासून आणि चोरलुटारूंपासून प्रजेचें रक्षण करणें ही दोन्हीं कामें युक्तीनें करावयास पाहिजे होतीं. ती बाईसाहेबांनीं, जनकोजीराव ह्यांचा विरुद्ध पक्ष उत्पन्न होईपर्यंत, चांगल्या रीतीनें केलीं, महाराज दौलतराव शिंदे मृत्यु पावले, त्या वेळीं ब्रिटिश कांटिंजंट व किल्यांवरचें सैन्य खेरीजकरून, १४,००० पायदळ, १०,००० घोडेस्वार, आणि २५० तोफा होत्या. एवढ्या मोठ्या सैन्याचा बंदोबस्त करणें फार कठीण काम होतें. बाईसाहेबांनी हें सैन्य चांगल्या स्थितींत ठेवून व त्याचे निरनिराळे कंपू करून, त्यांच्यावर स्वतंत्र अधिकारी नेमिले. कर्नल स्लीमन ह्यांनी इ. स. १८३३ मध्यें-ह्मणजे बायजाबाईसाहेबांच्या कारकीर्दीच्या अखेरीस, शिंद्यांच्या फौजचे २५ कंपू असून, त्यांपैकी ३ कर्नल आलेक्झांडर, ६ आपाजी खंडेराव, ११ कर्नल जेकब, आणि ५ कर्नल फिलोज ह्यांच्या ताब्यामध्यें होते, असे लिहिले आहे.

 बाईसाहेबांनी सैन्याची व्यवस्था करून आपल्या राज्यांतील पेंढारी व ठग लोक ह्यांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला. सर जॉन मालकम ह्यांनी