पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कीर्दीत हुजऱ्याच्या जागेवरून पागेचा शिलेदार बनला. ह्या संबंधाने अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे कीं, बाजीराव साहेब एके वेळीं शाहू महाराजांस भेटण्याकरितां राजवाड्यांत गेले. त्या वेळी त्यांचा हुजऱ्या राणोजी हा, नेहमीप्रमाणे त्यांच्या चर्मपादुका हातीं घेऊन, दाराशीं बसला. तितक्यांत त्यांस आकस्मिक निद्रा लागली. बाजीराव साहेब छत्रपतींची भेट घेऊन दाराबाहेर आले; तों, त्यांचा स्वामिनिष्ठ सेवक त्यांच्या चर्मपादुका उराशीं घट्ट धरून बसलेला त्यांच्या नजरेस पडला. अर्थात् हुजऱ्याची स्वामिभक्ति पाहून त्यांस आश्चर्य वाटलें व फार संतोष झाला. नंतर त्यांनी लवकरच त्यास आपल्या पागेमध्यें शिलेदाराची जागा दिली. येणेप्रमाणे राणोजीचा भाग्योदय झाला. ही मालकम साहेबांनी दिलेली आख्यायिका खरी आहे. ह्यावद्दल ग्वाल्हेरचे रेसिडेंट क्याप्टन स्टुअर्ट यांनी चौकशी-अंती खात्री करून घेतलेली आहे. ह्या आख्यायिकेच्या पुष्टिकरणार्थ त्यांनी आणखी असे लिहिले आहे कीं, "राणोजीनें ह्या पेशव्यांच्या जुन्या चर्मपादुका आपल्या भाग्योदयाचें मूळकारण आहेत असें समजून, त्या नीट जतन करून ठेवल्या होत्या; व त्याविषयीं तो फार पूज्यभाव बाळगीत असे." राणोजीची ही स्वामिनिष्ठा पाहून कोणाचे हृदय आनंदानें उचंबळणार नाहीं बरं ? असो. राणोजीच्या उदयासंबंधानें सर जॉन मालकम ह्यांनी जी दंतकथा दिली आहे, तिच्यावरून राणोजी प्रथमतः हलक्या दर्जाचा नोकर होता असें दिसून येते. तथापि त्यामुळें शिंद्यांचे घराणे कमी योग्यतेचें होतें, असें मात्र मानितां येत नाहीं.

 राणोजीचा चरित्रवृत्तांत फार मनोरंजक व वीररसपरिप्लुत असा आहे. तो समग्र दाखल करण्याचे हें स्थळ नाहीं. तथापि त्याच्या व त्याच्या वंशजांच्या कारकीर्दीचें अत्यल्प सिंहावलोकन ह्या भागांत सादर करणें अवश्य आहे.