यावच्चंद्रदिवाकरौ विसरले जाणार नाहींत अशी आशा आहे. ह्याच प्रसंगी गव्हरनरजनरलसाहेबांनीं, शिंदे सरकारचे दिवाण दिनकरराव ह्यांच्या अप्रतिम राजनिष्ठेबद्दल व अद्वितीय साहाय्याबद्दल त्यांचा योग्य नामनिर्देश करून त्यांचा उत्कृष्ट रीतीनें सन्मान केला; आणि त्यांच्या संबंधाने असे उद्गार काढिले कीं, "अशा संकटप्रसंगी आपल्या राज्यकर्त्याची सेवा करणारा आपल्यासारखा स्वामिनिष्ठ, धैर्यवान् आणि शहाणा दिवाण क्वचितच अवतीर्ण झाला १असेल." हे धन्यवाद दिवाण दिनकरराव ह्यांस व त्यांच्या यजमानांस सारखेच भूषणावह होत ह्यांत शंका नाहीं.
असो. ह्याप्रमाणें महाराज शिंदे सरकार ह्यांनीं व त्यांच्या पितामही श्रीमती बायजाबाईसाहेब ह्यांनीं इंग्रज सरकारास अत्युत्कृष्ट साहाय्य केलें, त्याचें उत्तम सार्थक झाले. ह्या साहाय्यामुळें इंग्रजी राज्यावर आलेलें भयंकर संकट दूर होऊन तें चिरस्थायी झालें, ही गोष्ट निर्विवाद आहे. महाराज जयाजीराव शिंदे ह्यांच्या अनुकूलतेमुळें इंग्रजी राज्य बचावलें गेलें, ही गोष्ट इंग्रज ग्रंथकारांनी प्रांजलपणें कबूल केली आहे. ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर म्याक्फर्सन ह्यांनी "शिंदे सरकार विरुद्ध पक्षास सामील झाले असते, तर बंडास काय स्वरूप प्राप्त झालें असते, ह्याची कल्पना करवत नाहीं." असे स्पष्ट उद्गार काढिले आहेत. त्याचप्रमाणें मध्यहिंदुस्थानचे पोलिटिकल एजंट सर रॉबर्ट ह्यामिल्टन ह्यांनी ता. २६ एप्रिल १८५८ च्या एका खलित्यामध्यें बायजाबाईसाहेबांचा नामनिर्देश करून असे लिहिले आहे कीं, "पेशव्यांच्या पक्षानें, होळकर, बायजाबाईसाहेब आणि शिंदे ह्या तिघांच्या नांवांचा उपयोग करून, लोकांमध्ये असंतोष उत्पन्न करण्याचे कामीं व राजद्रोह वाढ-
1. "I believe that seldom has a ruler been served in troubled times by a more faithful, fearless and able minister than yourself."