पान:बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र.djvu/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९

आहुति पडणार, हें भविष्य ठरल्यासारखेंच झालें. कर्नल सदरलंड नामक एका माहितगार युरोपियन गृहस्थानें त्यावेळच्या ग्वाल्हेरच्या स्थितीबद्दल जो लेख लिहिला आहे, त्यांत हें भविष्य ध्वनित केलें आहेः- "बायजाबाईसाहेब ह्या आमच्या साहाय्याशिवाय राज्यकारभार चालवीत आहेत, आणि आतांपर्यंत, बालराजानें संस्थानांतील आपल्या अनुयायी मंडळीसह बायजाबाईंच्या राज्यकर्तृत्वावर किंवा सामर्थ्यावर कांहीं छाप बसविली आहे, असें दिसत नाहीं. तथापि जसजसा तो वयानें मोठा होत जाईल व सज्ञान होईल, त्याप्रमाणें त्यास, जर साधारण महत्त्वाकांक्षा व मनुष्याचे उचित मनोविकार असतील, तर पुढेंमागें जी सर्व राजसत्ता त्याचीच होणार, तिचा कांहीं भाग हातीं घेण्याची इच्छा त्यास उत्पन्न झाल्यावांचून राहणार नाही. त्याचप्रमाणे, संस्थानच्या सरदार व मुत्सद्दी लोकांपैकीं कांहींना नेहमीं नवीन उदयास येणाऱ्या सूर्याप्रमाणें नूतन राजाची आवड अधिक असते, व कांहींना स्त्रीच्या राज्यकारभारापेक्षां पुरुषाचा राज्यकारभार अधिक पसंत वाटतो, असे सर्व लोक बालराजाचा पक्ष लवकरच स्वीकारतील. आणि असें झालें ह्मणजे त्यांच्या संयुक्त बळापुढे रीजंट राणीचें राज्य बिलकूल टिकणार नाहीं. खजिन्याचें आधिपत्य व संस्थानचीं इतर कित्येक साधनें ह्यांच्या योगानें बायजाबाईंच्या पक्षाची कांही दिवस सरशी होईल व त्यांस प्रतिपक्षाशीं थोडा वेळ टिकाव धरतां येईल. अशा वादामध्यें ब्रिटिश सरकार हें अगदीं अलिप्त राहील हेंच विशेष संभवनीय आहे. आह्मी कोणावरही मेहेरबानी न करितां, उभय पक्षांस जितकें ज्यास्त स्वातंत्र्य देऊं, तितकें त्या संस्थानचें हित होऊन, त्याची राज्यव्यवस्था अधिक राष्ट्रीय व अधिक कार्यसाधक होईल. व तेणेंकरून आह्मांस त्या संस्थानच्या राजकारणांत हात घालण्याची अवश्यकता तितकी कमी कमी वाटत