पान:बलसागर (Balsagar).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 मीनाक्षी पुरम्

 

 १९५६ मध्ये नागपूरला डॉ. आंबेडकरांनी तीन लाख अनुयायासह बौद्धधर्म प्रवेश केला तेव्हा देशात फारशी खळबळ माजली नाही. ' प्रमुख नेते आणि विचारवंत यांनी आंबेडकरांच्या बौद्धधर्मस्वीकाराकडे दुर्लक्ष केले' असे धनंजय कीर यांनी आपल्या आंबेडकर चरित्रात या घटनेवर लिहिताना म्हटले आहे, ते खरेच आहे. (पृ. ५२३) याउलट जेमतेम हजार दोन हजार हरिजनांनी मीनाक्षीपुरम येथे व आसपास धर्मांतर केल्यावर देशात' आज केवढी खळबळ माजली ? पंतप्रधान इंदिरा गांधींपासून शंकराचार्यांपर्यंत आणि डाव्या कम्युनिस्टांचे बौद्धिकप्रमुख बी. टी. रणदिवे यांच्यापासून रा. स्व. संघ - विश्व हिंदू परिषद या संघटनांपर्यंत सर्वांनी या हरिजनांच्या इस्लामधर्म प्रवेशाची तातडीने व गंभीरतेने दखल घेतली व त्यातून निरनिराळी विश्लेषणे व उपाययोजना पुढे आल्या.
 (१) अरबांचा पैसा (२) उच्चवर्णीयांकडून हरिजनांना मिळणारी हीन वागणूक म्हणजेच सामाजिक विषमता (३) जमीन फेरवाटप कार्यक्रमाचे अपयश व हरिजनांचा एकूण आर्थिक मागासलेपणा (४) हरिजनांचा, दलितांचा अधिक आक्रमक बनण्याचा प्रयत्न - अशी सर्वसाधारण चार कारणे या मीनाक्षीपुरम् धर्मांंतरामागे असल्याचे प्रतिपादन केले जात आहे.
 राजकीय सत्तास्पर्धेत हरिजनांचा बळी दिला जातो हेही एक पाचवे कारण येथे नोंदता येईल.

 ही कारण मालिका आणखीही वाढवता येईल; परंतु एक गोष्ट या मीनाक्षी पूरम् घटनेमुळे अगदी स्पष्ट झाली. सगळे धर्म समान असले, सर्वधर्मसमभाव

।। बलसागर ।। ८०