________________
व्याकरण. व्याकरण, - शिक्षा शिकली असतां शब्दांच्या किंवा पदांच्या योग्य उच्चाराचे विशेष ज्ञान होते, परंतु येवढ्यानेच काम भागत नाही. शब्दांत प्रकृति कोणती, प्रत्यय कोणता, शब्दांचे स्वरूप मणजे काय, त्यांचा अर्थ काय असतो, शब्दांचा वाक्यांत परस्परांशी कसा व काय संबन्ध असतो, वगैरे गोष्टींची चांगली माहिती झाल्याशिवाय संहितेचा किंवा वाक्यांचा अर्थ समजणार नाही. वेदाच्या षडङ्गांमध्ये व्याकरण हे मुख आहे. ह्मणून ह्या प्रधान अंगाचा अभ्यास अवश्य झालाच पाहिजे. व्याकरणाचे ज्ञानाशिवाय वाक्यार्थ समजणार नाहीं आणि अर्थ समजला नाही तर वेदाध्ययनांत कांहीं अर्थ नाही. हे सर्व व्यर्थ श्रम होतील. जेथें अग्नि नाही अशा ठिकाणी पुष्कळ शुष्क इन्धन आणून ठेवले, तर त्यापासून जसा अग्नि निघत नाही व अग्नीपासून होणारी कार्ये घडत नाहीत, त्याप्रमाणे व्याकरणाचे ज्ञानावांचून अर्थबोध होत नाही, आणि अर्थबोध झाला नाही तर वेदकर्माचें फलहि प्राप्त होणार नाही. याकरितां व्याकरण शिकणे अवश्य आहे. शिवाच्या डमरूंतून पहिल्यांदा चौदा सूत्रे बाहेर पडली. त्यांस माहेश्वर सूत्रं म्हणतात. 'अइउण् अलक्' इत्यादि ही सूत्रे होत.ह्या सूत्रांच्या आधारें पाणिनीने आपला व्याकरणाचा अष्टाध्यायीनामक सूत्रात्मक ग्रंथ रचला, अष्टाध्यायींत आठ अध्याय आहेत. प्रत्येक .. . ।