पान:पायवाट (Payvat).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुणाही प्राचीनाचा पदर धरता आला नाही, कुठेही ते कायमचे रमू शकले नाहीत, यातच त्यांच्या मनोभूमिकेचे पुष्कळसे निराळेपण होते.
 केशवसुतांनी अनुकरण किती केले आणि ते कितीदा जमले हा केशवसुत या माणसाचा इतिहास आहे. ते कलावंताच्या प्रकृतीचे आकलन नव्हे. वाङ्मयीन व्यवहाराचा विचार करताना एकाच व्यक्तीमधील माणूस आणि कलावंत यांतील संवाद-विसंवादही आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. इंग्रजी कवितांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून केशवसुतांनी अनेकदा प्रेमकविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी आरंभापासून या प्रेमकविता आपण पाहू शकतो. परंपरेने स्त्रीचे वर्णन करावयाचे झाल्यास रतीशी निगडित असे ते करण्याची पद्धत होती. केशवसुतांनी स्वतःच्या वैयक्तिक जीवनाशी शक्यतो प्रामाणिक राहून प्रेमकविता लिहिण्याचा प्रयत्न 'प्रियेचे ध्यान 'सारख्या कवितांतून केलेला आहे. कृष्णाजी केशव दामले या माणसाला आपली बायको आवडत होती की नव्हती, हा माझ्यासमोरचा प्रश्न नाही. खरोखरच त्यांना पत्नीविषयी आत्यंतिक ओढ असेल. पत्नीला सोडून पुण्याला जावे लागणार, याचे त्यांना वाईटही वाटत असेल. ज्याप्रमाणे मुंगळा साखरेकडे समुत्सुक होऊन धावून गेला नसेल, त्याहीपेक्षा अधिक उत्कट ओढीने मी तुझ्याकडे धावत येईन ही भूमिका प्रामाणिकही असेल, हे सगळे गृहीत धरले तरी प्रेम ही भावना केशवसुतांना कधीच कवितेच्या पातळीवर नेता आलेली नाही, हे उघड आहे. मग केशवसुत प्रेम म्हणजे काय, ते कुठे मिळेल, असा विचार करीत असोत की स्वतःच्या पत्नीवर कविता लिहीत असोत. पुष्कळदा तर कवितेला आपली प्रेयसी गृहीत धरून केशवसुतांनी तिची विनवणी केलेली आहे. 'फिर्याद 'सारख्या कवितेत हा प्रकार आढळून येतो. पण केव्हाही ही भावना यशस्वितेने व्यक्त करणे त्यांना जमले नाही.

 ज्या पिढीत केशवसुत होते त्या पिढीची परिस्थिती व वातावरण पाहता केशवसुतांना प्रेमाची अभिव्यक्ती करणे जमले नसेल तर ते एकवेळ आपण समजू शकतो. पण आईविषयक एकही कविता त्यांना जमली नाही. आरंभीच्या कालखंडात या विषयावर एक कविता आहे. तशी अगदी शेवटी याच विषयावर अजून एक कविता आहे. पण काव्य म्हणून दोन्ही कविता फसलेल्या आहेत. केशवसुतांच्या कवितांत त्यांच्या मित्रावर कविता आहेत. मजुरावर कविता आहेत. मुलास झोडपणाऱ्या पंतोजीस पाहून त्यांनी कविता लिहिली आहे. तशी अंत्यजावरसुद्धा कविता लिहिली आहे. माणूस केशवसुतांचे मन, त्यांची विचार करण्याची पद्धत, नव्या प्रयोगांची धडपड यांचा आलेख काढण्याच्या दृष्टीने या कवितांना ऐतिहासिक महत्त्व असू शकते. पण साहित्यकृतीची पातळी गाठणे यांपैकी एकाही ठिकाणी कवीला जमलेले नाही. पुनःपुन्हा केशवसुत निसर्गावर कविता लिहीत असतात. एक तर या कविता लिहीत असताना निसर्ग सोडून देऊन अगर निसर्गाच्या साक्षात सौंदर्यप्रत्ययाला सोडून देऊन त्यांची कविता सांकेतिक वर्णनाकडे वळत राहते, किंवा अवांतर तपशील देत राहते. पुष्कळदा तर मला असेही वाटते की, 'कविता आणि प्रीती'सारखी कविता लिहिताना रघुनाथ पंडित त्यांच्या डोळ्यासमोर होता की

केशवसुत : काही प्रतिक्रिया ७७