पान:पायवाट (Payvat).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्थावर फारसे दुमत नाहीच. प्रश्न तपशीलाचा आहे.
 लेखकाने आपल्या अनुभवाशी प्रामाणिक राहायचे म्हणजे नेमके काय करायचे ? लेखक कधी जाणूनबुजून स्वतःच्या अनुभवाशी अप्रामाणिक होण्याचा प्रयत्न करीत नसतो. पण लेखक जे प्रामाणिकपणे जाणवल्याचे सांगतो, त्या अनुभवाचा प्रामाणिकपणा वाचकांना जाणवत नाही त्याचे काय करावे ? आणि अनुभवांशी नुसते प्रामाणिक राहून काय उपयोग ? कारण लेखकाजवळ स्वतःचे पृथगात्म व्यक्तिमत्त्व नसेल, पृथगात्म अनुभव नसतील, तर त्याने या सर्वसामान्य अनुभवांशी प्रामाणिक राहप्यात तरी काय अर्थ आहे ? एरिक फ्रॉमने म्हटले आहे, विचार करण्याचे सामर्थ्य असेल तरच विचारस्वातंत्र्याला अर्थ असतो. वाङ्मयनिर्मितीसाठी तर हा सल्ला अधिकच महत्त्वाचा आहे. पृथगात्म व्यक्तिमत्त्व, पृथगात्म अनुभव असला तरच त्या अभिव्यक्तीला आणि अभिव्यक्ति-स्वातंत्र्याला अर्थ असतो. ही पृथगात्मता सार्वत्रिक नसते. म्हणून लेखकांना कृत्रिम मार्गानी तिचे अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड करावीशी वाटते. सर्वसामान्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळे, निराळे, चमत्कारिक सांगितल्याशिवाय आपल्या अनुभवाचा वेगळेपणा आणि त्याच्याशी असणारा आपला प्रामाणिकपणा सिद्ध कसा होणार ? या कलाहीन जाणिवेचा परिणाम वाङ्मयावर कमी होत नसतो. आपण रंजनवादी नव्हत हे सिद्ध करण्याच्या अट्टाहासातून मुद्दाम अपवादादाखल व्यक्तींच्याकडे, विकृतींच्याकडे, अभिव्यक्तीच्या आधुनिक लकवींच्याकडे वळण्याची लेखकाला गरज भासू लागते. वाङ्मयातील आत्मनिष्ठेचे खरे स्वरूप वाचकांना अनुभवाचा सलगपणा, जिवंतपणा व त्याची उत्कटता जाणवते हे असते. ही बाबच विसरून जाऊन आत्मनिष्ठेचे प्रयोग केले जाऊ लागतात.
 बोध व प्रचाराचा आपल्यावर बसणारा शिक्का टाळण्यासाठी आपण व्यक्त करीत असलेल्या अनुभवाचे जीवनप्रवाहात स्थान पाहणेच टाळले जाते. 'अनुभव' असा शब्द आपण वापरतो त्यावेळी त्यात काय गृहीत आहे, हे सोयीस्करपणे विसरण्याची इच्छा होऊ लागते. मरण पाहताना जाणवणाऱ्या सुन्नपणात जीवनाच्या नश्वरपणाचे भान गृहीतच असते. त्या व्यापक विनाशाच्यासमोर आपला हतबलपणाही गृहीत असतो. मानवाने विज्ञानाद्वारे निसर्गावर जे विजय मिळविले त्या सर्व विजयांचा फोलपणाही जाणवून जातो. अनुभवाच्या पोटात हे सगळे येतच असते. अनुभवात अंगभूत नसणाऱ्या उसन्या विचारांचे ओझे त्यावर लादू नये हे जितके खरे, तितकेच त्या अनुभवातच काही अंगभूत चिंतनगर्भता असते हेही खरे आहे. हा अंगभूत चिंतनगर्भ आशय त्या अनुभवाची झेप व कक्षा विकसित करीत असतो की नाही, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांच्या प्रतिभेत हे निरूपणाचे स्वाभाविक सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य त्या अनुभवाचा कलात्मक दर्जा वाढविते की नाही, हा विचारच आपण सोडलेला आहे. सार्त्र, कामू आणि इलियट यांची नावे घेताना या लेखकांनी व्यक्त केलेल्या अनुभवांत चिंतनगर्भ आशय किती मोठा आहे, हे सांगण्याचे आपण सतत टाळीत असतो.

 एकीकडे रंजनवाद व बोधवादाचे संस्कार टाळणे लेखकांना कठीण जाते. दुसरीकडे

१०६ पायवाट