पान:परिचय (Parichay).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चक्रपाणि । ५५

 हे सर्व निवाडे त्या त्या काळात त्या त्या प्रांतातील परिस्थितीवर ठरत असतात. कर्नाटकात जातिभेदाच्या आणि विषमतेच्या विरुद्ध आणि कर्मकांडाच्या विरुद्ध एक आंदोलन बसवांनी सुरू केले. बसवांना यासाठी शुद्ध शैव उपासना पुरेशी वाटली. शैव असूनही आपण कर्मकांड व तंत्र यांचा पाडाव करू शकतो, असे त्यांना वाटले. त्यांना वैष्णव होण्याची गरज वाटली नाही. एखाद्या प्रांतात वैष्णव राहूनही वैष्णव कर्मकांडाच्या विरुद्ध आंदोलन उभारणे तेथील संतांना शक्य वाटेल, त्यांना शैव होण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्रात मात्र शैव संतांना वैष्णव होण्याची गरज भासली. ही गरज शैव ज्ञानेश्वरांनाच भासली असे नाही तर ढेरे यांच्या विवेचनाचा निष्कर्ष असा की, हीच गरज शैव चक्रधरांनाही भासलेली आहे. सर्व शैवांना त्या काळात वैष्णव होणे सोयीचे का वाटावे, हाही प्रश्न एकदा तपशिलाने चर्चावा लागेल. ढेरे यांनी तो चर्चिलेला नाही.
 तेराव्या शतकातील महाराष्ट्रात महानुभाव आहेत, तसे वारकरीही आहेत. दोन्ही पंथ जवळपास समकालीनच म्हटले पाहिजेत. त्यातल्या त्यात महानुभाव पंथ थोडा पूर्वकालीन आहे आणि वारकरी पंथ उत्तरकालीन आहे. या दोन्ही पंथांचा, काही भ्रम बाजूला ठेवून, विचार करण्याची गरज आहे. एक भ्रम असा की, महाराष्ट्रात महानुभाव संप्रदायाचा पराभव झाला. ही गोष्ट काही संशोधकांनी आग्रहाने मांडलेली असली, तरी ती एक भ्रामक बाब आहे. चक्रधरांनी ज्या वेळी निरोप घेतला, त्या वेळी पंथीय मंडळींची संख्या २०० पेक्षा जास्त नव्हती. नागदेवाचार्यांच्या मृत्यूच्या वेळी ही संख्या कमी झालेली नसून वाढलेली आहे. परशुराम वासांच्या मृत्यूनंतर महानुभाव संप्रदाय वेगवेगळ्या आम्नायांत विभागला गेला, ही घटना संख्या कमी झाल्याची द्योतक नसून वाढल्याची द्योतक आहे. आणि आज महाराष्ट्रात महानुभाव सांप्रदायिकांची संख्या मोजायचीच झाली, तर ती दशलक्षांहून अधिक आहे; कमी नाही. महानुभाव संप्रदायाने सर्व महाराष्ट्र जिंकला आणि नंतर त्यांच्या हातून सर्व महाराष्ट्र निघून गेला व त्यांचा पराभव झाला, हे ऐतिहासिक तथ्य नाही. ऐतिहासिक सत्य असे आहे की, हा संप्रदाय क्रमाने विकसित होत गेला. त्याची अनुयायी-संख्या वाढत गेली. पण वारकऱ्यांनी सर्व महाराष्ट्र झपाटून भारून टाकला, तसे महानुभाव संप्रदायाला करता आलेले नाही. हा संप्रदाय वाढला, वाढत राहिला; पण वारकरी संप्रदाय ज्या वेगाने वाढला आणि ज्या वेगाने बळकट झाला, तसा हा संप्रदाय बळकट झाला नाही. आणि हाही एक वैष्णव संप्रदाय आहे. महानुभाव संप्रदायाला यश किती आले, यावर वाद होऊ शकेल; पण हाही जीवनाचे शुद्धीकरण करणारा भक्तिमार्गी संप्रदाय आहे.
 महानुभाव संप्रदाय हा ब्राह्मणेतरांचा संप्रदाय आहे, अशीही एक भ्रामक समजूत अनेकांच्या डोक्यात वावरत असताना दिसते. आज विसाव्या शतकात