पान:परिचय (Parichay).pdf/35

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महानुभाव वाङमयाचे संशोधन । ३५
 

उद्याच्या मंडळींसाठी राखून ठेवली. भाऊसाहेबांच्या इतका तोल सर्वांनाच सांभाळता आलेला नाही. पण सर्वांचा प्रयत्न मात्र तो राहिला.
 महानुभाव-वाङमयाचा प्रमुख भाग मराठी साहित्याच्या पहिल्या बहरात उदयाला आलेला आहे. तेराव्या शतकातील भाषेची रूपे व समाज ह्याही दृष्टीने हे वाङमय महत्त्वाचे आहे. ह्या वाङमयाच्या बाबत सापडेल ते हस्तलिखित उचलणे आणि छापणे ह्यात इतिकर्तव्यता नव्हती. म्हणून प्रत्येक ग्रंथाच्या जास्तीत जास्त जुन्या पोथ्या गोळा करणे; पूढच्या आवृत्तीचे वेळी अधिक जूने हस्तलिखित मिळाल्यास ते स्वीकारणे; सर्व हस्तलिखितांच्या आधारे अधिकृत संहितेची निश्चिती करणे; शब्दकोश, टीपा, प्रस्तावना जोडणे ; हे कार्य दक्षतेने कोलते करीत राहिले. गोविंदप्रभुचरित्र, रुक्मिणीस्वयंवर, शिशुपालवध उद्धवगीता, वछाहरण, सैह्याद्री वर्णन स्थानपोथी इ. ग्रंथ म्हणजे ह्या परिश्रमाची जिवंत स्मारके आहेत. इतके मोठे कार्य ह्या क्षेत्रात कुणाही मोठ्या एका अभ्यासकाचे नाही. अभ्यासक्रमिक आवृत्त्या सिद्ध करण्यापेक्षा हे काम निराळे. अजून भाऊसाहेबांनी 'लीळाचरित्र' ची प्रत दिलेली नाही ही दु:खाची गोष्ट आहे. जर कोलते-संपादित लीळाचरित्र सटीप उपलब्ध झाले तर ती एक देणगी ठरेल. पंथीय मंडळींना त्यांच्याही ग्रंथांत पाठभेद, प्रक्षेप इ. बाबी आहेत; त्यांच्याही ग्रंथात बनावट भाग आहे, ह्याची जाणीव प्रयासामुळे झाली. ह्या क्षेत्रात त्यांच्या खालोखाल दुसरे नाव वा. ना. देशपांडे ह्यांचे घ्यावे लागेल. संयमाने विधायक चिकित्सा कशी करावी याचे मार्गदर्शन पंथेतरांना करण्यात व चिकित्सक अभ्यासाचे स्वागत करावे, त्यावर रुसू नये ही सवय पंथीयांना, महंतांना लावण्यात भाऊसाहेबांना खूपच परिश्रम करावे लागले आहेत.

 डॉ. कोलते ह्यांनी चिकित्सेला मोठया धीराने आरंभ केला. कोणत्याही धार्मिक वाङमयात ज्याला आपण परंपरा म्हणतो तिचे स्वरूप मोठे चमत्कारिक असते. कधी ह्या परंपरेला सत्याचा आधार असतो; कधी अज्ञान व अंधश्रद्धा द्या पलीकडे इतर कशाचा आधार नसतो. कोलते ह्यांनी चिकित्सेच्या मर्यादा निश्चित केल्या. ते पंथातील प्रमाण बाबी क्रमाने प्रस्थापित करतात आणि त्याविरुद्ध जाणाऱ्या अंधश्रद्धा अप्रमाण ठरवीत जातात. ह्या मर्यादेबाहेर कोलते चिकित्सा नेत नाहीत. परंपरा असे मानते की, भास्करभट्टाचा · शिशुपालवध' शके ११९५ चा आहे. कोलते अतिशय शांतपणे जुन्या पोथ्या गोळा करून हे दाखविणार की, जुन्या पोथ्यांच्यामध्ये ही ओवी नाही म्हणून ती प्रक्षिप्त आहे. पंथीय पुराव्याच्या आधारेच त्यांनी 'शिशुपालवधा' चा काळ शके १२३५ ठरवून दिलेला आहे. महानुभाव काव्यातील 'सातीग्रंथ' हे ज्ञानेश्वरीनंतरचे आहेत. ह्या संशोधनकार्यात महानुभाव वाङमय ज्ञानेश्वरांपूर्वीचेच आहे हा हट्ट त्यांनी धरला नाही. इतरांनाही धरू दिलेला नाही. शिशुपालवधाच्या काळाचा नागदेवाचार्याच्या निधन-शकाशी संबंध आहे.