पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

की चक्क मंडप अपुरा पडला. मेळावा यशस्वी झाला. संपर्काची पहिलीच परीक्षा रुपाताई उत्तीर्ण झाल्या होत्या. सुरुवात तर दणक्यात झाली होती.
 पण खरी परीक्षा अजून सुरु व्हायची होती. पुढच्या मीटिंगसाठी आशाताईंना फोन करायची वेळ आली तेव्हा ते फोन कुणी तरी पुरुष उचलत होते. पती, सासरे किंवा मुलांकडे हे फोन होते. ही मंडळी कुठे तरी शेतात, कामावर नाही तर कॉलेजात असत. मग निरोप द्या म्हणून विनवण्या कसाबसा निरोप त्यांना मिळायचा आणि त्या पोहोचायच्या ! दुसरी अडचण तर याहून मोठी होती. एक मीटिंग होऊन दुसरी येईपर्यंत आशाताईंनी (किंवा त्यांच्या पुरुष नातेवाईकांनी) सिमकार्ड बदललेलं असायचं. अशा वेळी त्यांच्यापर्यंत मीटिंगचा निरोप पोहोचवणं ही मोठीच कसोटी असाचची. मग त्या गावातला इतर कुणी परिचित शोधून तो निरोप त्या आशाताईंपर्यंत पोहाचायचा. एका मीटिंगच्या संपर्कासाठी तब्बल आठ दिवस आधी तयार सुरु व्हायची. तरीही सगळ्या आशांपर्यंत निरोप पोहोचलाय असे व्हायचे नाही.
 सुरुवातीच्या एका मीटिंगची आठवण रुपाताई सांगतात. सगळी तयारी करुन वर्षाताई, शैलाताई आणि अन्य मंडळी मिटिंगसाठी शिरुरला पोहोचली तर फक्त १०-१२ अशा हजर. फोनवर तर सगळ्या येतो म्हणाल्या होत्या. चौकशी केल्यावर कळलं की आरोग्य विभागाच्या त्यांच्या पध्दतीनुसार त्यांच्या पध्दतीनुसार त्यांच्या वरिष्ठांनी मीटिंगबद्दल कळवायला हवं ! पुढच्या मीटिंगपासून ही पध्दत अवलंबली. 'दुहेरी' संपर्क साधायला सुरुवात केली आणि हजेरी वाढली.
 कधी कधी तर मीटिंग च्या दिवशीही फोन करावे लागायचे, मीटिंगची आठवण द्यावी लागाची. पण रुपाताईंनी हे न कंटाळता केलं. पुष्कळदा काही जणी ती माहिती भरताना आईचे वय २५ आणि मुलीचे २० अशा गमतीशीर चुकाही करत. मग ते फॉर्म पुन्हा भरुन घ्यावे लागत. मुलींना या प्रकल्पात ' ओळख स्वत:ची' हे पुस्तक वाचायला देऊन त्यावर त्यांचा प्रतिसाद घ्यायचा होता. तर काही अशा चक्क एकमेकींची कॉपी करुन आणत. या सगळ्या कागदोपत्री कामांच्या मानसिकतेमधून आशांना बाहेर काढायला सुरुवातीला बरेच कष्ट पडले. माहिती खरी हवी. काम प्रत्यक्ष करायला हवं हे सारं पटायला वेळ लागला. पण जेव्हा प्रकल्पाचा उद्देश त्यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्या अत्यांत प्रामाणिकपणे आणि उत्साहाने काम करु लागल्याचं रुपाताई सांगतात. अर्थात याला शालन बड़े किंवा मुक्ता गीते यांसारखे काही आशाताईंचे अपवाद होते. त्या स्वत: फोन करुन मीटिंगबद्दल विचारत स्वतःसोबत शेजारच्या गावांतील आशाताईंना घेऊन येत.