पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




जणींना अश्रु अनावर झाले. महिलांनी एकत्र येऊन गावातली दारुची दुकाने बंद करायचे ठरवले. ८० महिलांनी अर्जावर सह्या केल्या. मात्र दारुच्या दुकानदारांचा दबाव इतका होता की पोलिस ठाण्यात हा अर्ज घेतलाच गेला नाही. सलग १६ दिवस कार्यकर्ते पोलिस स्टेशनला जात होते पण पोलिसांनी दाद दिली नाही. अखेर वर्षा देशपांडे यांनी स्वत: बीड अधीक्षकांना फोन केला, निवेदन दिले.
 स्वत: पोलिस अधीक्षक गावात आले. बेकायदा दारु विक्री करणाऱ्या चारही जणांना पकडून नेले. एकाच्या घरात तर चक्क परदेशी दारुने भरलेली खोकी आढळली. सध्या तरी गावात शांतता आहे. किती दिवस दारु बंद होते ते बघूच' अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. पण गावात आता पुन्हा दुकान उघडलं जाणार नाही. हे मुक्ता ताई आणि किशोरींनी पक्क ठरवलं आहे. मुक्ताताईचे पती आधी काही वर्षे आश्रमशाळेत काम करत होते. अनुदान मिळाले नाही म्हणून अखेर नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. पतीची मुक्ताताईंना पूर्ण साथ आहे. एक मुलगा आणि मुलगी महाविद्यालयात शिकत आहेत. शिक्षण आणि सुरक्षा दिली तर मुली जग बदलू शकतात यावर त्यांचा विश्वास आहे.