पान:पंख फुटलेल्या मुली.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गावात काम सुरु असताना आधी किशोरवीयन मुलींचा गट तयार करायचा होता. मुलींची नावे होतीच, त्यांना एकत्र करायचे होते. मुक्ताताईंनी प्रत्येक मुलीच्या घरी जाऊन प्रकल्प काय आहे, हे समजून द्यायला सुरुवात केली. मुलींच्या घरातील लोक आधी हो. हो म्हणून नुसतेच ऐकून घेत. मुलींना मिटिंगला पाठवायची मात्र त्यांची तयार नसे. पण मुक्ताताईंनी अजिबात निराश न होता आपले काम सुरुच ठेवले. मुलींना आरोग्याबद्दल, स्वच्छतेबद्दल सांगू लागल्या. मुलींना ते आवडू लागले. त्या स्वत:च आता गटाची मीटिंग कधी आहे. असे विचारु लागल्या. हळूहळू लोकांचा विश्वास बसू लागला. गावातल्या सगळ्या किशोरवयीन मुलींनी मिटिंगला हजेरी लावायला सुरुवात केली. त्यांचा गट तयार झाला. नाव दिलं. सावित्रीबाई फुले गट. गेली दोन वर्षे गावात बालविवाह होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केला जातोय. बालविवाह ठरवणाऱ्या आई-वडिलांना प्रत्यक्ष भेटणे त्यांचे समुपदेशन करणे. तरीही ऐकले नाही तर कायद्याचा धाक दाखवणे अशा अनेक गोष्टी गावात कराव्या लागल्या.
 मुक्ताताईंच्या पुढाकाराने गावात तीन बालविवाह थांबले. एक मुलगी आठवीत होती. आई-वडील ऊस तोडायला जायचे मुलीचे लग्न गुपचूप करण्याचा त्यांचा विचार होता. ते कुटुंब मुक्ताताईचे शेजारी, त्यांना वाटले ओळखीमुळे मुक्ताताई गप्प बसतील. पण मुक्ताताईंनी स्पष्टपणे लग्न थांबवण्याचा इशारा दिला. वर्षाताईंनी त्यांना भेटून समजावले. पालकांना पटलेही आता ती मुलगी दहावीत शिकते आहे. इतर दोन प्रकरणांतही मुली लहान, आठवीतल्याच होत्या. गावात शाळा आठवीपर्यंत. त्यामुळे त्यानंतर शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे पालक ऊसतोडीला जातात, काळजी नको म्हणून मुलींची लग्न उरकून टाकत. आणखी दोन लग्नही पालकांना पटवून दिल्यावर थांबली. गेली दोन वर्षे गावात एकही बालविवाह झालेला नाही. १८ वर्षे पूर्ण होण्याआधी लग्नाचा विचार केला तर तुरुंगात जावे लागेल ही धास्ती आहे. गावात ० ते ६ वयोगटात मुलींची संख्याही वाटते आहे. गर्भलिंगनिदान चाचण्या आणि त्यामुळे होणारे गर्भपात थांबले आहेत. गावात महिलांची ग्रामसभा असते. हेच माहित नव्हते. अभियानाचे काम सुरु णालयवर महिलांच्या ग्रामसभा होऊ लागल्या. बायका गावाच्या, आपल्या प्रश्नांबद्दल बोलू लागल्या ११ ते १९ वयोगटातल्या मुली किशोरी गटात आहेत. प्रत्येक गावात असे गट तयार केले आहेत. अशा १० गावांसाठी एक किशोरीमित्र नेमला आहे. मुलींना या अभियानातून 'ओळख स्वत:ची' हे पुस्तक दिले जायचे. मुलींनी ते वाचून एक प्रश्नावली भरुन देणे अपेक्षित होते.