पान:निर्माणपर्व.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "नाही साहेब ! आम्ही दरोडा घातला नाही, पाटलानीच आम्हाला धान्य नेण्यासाठी बोलावले-" आम्ही उभ्या उभ्या आरोपींची मुलाखत घ्यायला सुरुवात केलेली होती.

 शेजारी गणवेशात तुरुंगाधिकारी, वॉर्डर्स उभे होते, त्यामुळे मोकळेपणा असा मुलाखतीत येत नव्हता.

 जामिनाचा विषय काढला. या सर्व लोकांना जामिनावर सुटायची इच्छा होती. पण प्रत्येकास ९०० रुपयांचा जामीन कुठून मिळवायचा असा प्रश्न होता.

 घरी मुलेबाळे उपाशी होती. जामिनावर सुटले तरी यांना काम मिळण्याची पंचाईत पडणार होती.

 यांच्या जमिनी गेलेल्या होत्या. जमिनी मिळाल्या तर शेती करण्याची त्यांची तयारी होती.

 ‘सरकार तुम्हाला जमिनी देते. पण दारूसाठी, लग्नासाठी तुम्ही कर्ज काढता आणि या जमिनी पुन्हा सावकाराकडे जातात. मग देऊन तरी काय उपयोग'- असा आमचा एक प्रश्न होता.

 चौघांपैकी तिघेजण तर म्हणाले की, ते दारू पीत नाहीत. एकाने कबूल केले की, जमीन मिळाली तर दारू सोडायला तो तयार आहे.

  मध्येच तुरुंगाधिकारी जरा दुसरीकडे गेले. आम्ही आरोपींना विचारले : लोक असेही म्हणतात की, तुम्हाला पाटलांच्या जमिनी हव्या होत्या. पाटलांनी तुम्हाला धान्य घ्यायलाच जर बोलावले होते, तर हत्यारे कशासाठी घेऊन जमला होतात ?  नाही साहेब, हत्यारं नव्हती. आम्हाला धान्य हवे होते. पाटलांनी आम्हाला तसा निरोप दिला होता.'

  ‘हत्यारं नक्की नव्हती ?'

  'नव्हती. खरं सांगतो.' ....



 हत्यारे होती, हत्यारे नव्हती, धान्य लुटायला जमले, धान्य घ्यायला जमले. गेले चार दिवस आम्ही यासंबंधीच्या उलटसुलट कथा ऐकत होतो. नक्षलवादी उठावापासून शेतमजुरांना धान्य देण्याघेण्याच्या नेहमीच्या साध्या व्यवहारापर्यंत सर्व तऱ्हेचे तर्कवितर्क लोक लढवीत होते.

  ज्यांच्या शेतात ही घटना घडली ते श्री. जगन्नाथ पाटील तर फारच नर्व्हस दिसले, विषण्ण होते.

निर्माणपर्व । ६