पान:निर्माणपर्व.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘सांगा, अशा परिस्थितीत आम्ही शेती करायची की नाही ?' पाटीलवाडीवर - त्यांच्या शेतीवाडीवर आम्ही चार-सहा लोक त्यांना भेटायला गेलो तेव्हा उतरलेल्या स्वरात, अधूनमधून ते आम्हालाच प्रश्न विचारीत होते.

 जगन्नाथ पाटील यांनी सांगितली ती घटना अशी :

 दोन मे १९७१. रविवार होता. सकाळी स्नान वगैरे नुकतेच आटोपले होते. इतक्यात कामावरच्या माणसांनी सांगितले की, गर्दी येते आहे. पाठोपाठ वाडीच्या मुख्य रस्त्यावरून जमाव आत येताना दिसला. सगळे लोक रांगेत, चालत येत होते. तिरकामठे, भाले वगैरे हत्यारे जमावाच्या हातात होती. त्यामुळे एकदम भीतीचे वातावरण निर्माण झाले. कामावर येणाऱ्या गड्यांना बाहेरच अडवले गेले. जमावाने मुख्य इमारतीला घेराव घातला. आतले कुणी बाहेर पडू शकत नव्हते. बाहेरूनही कडेकोट बंदोबस्त होता.

 गणपतने सुरुवात केली. 'गरिबी हटवण्यासाठी आम्ही आलो आहोत. सरकार आता आमचंच आहे-' असलं काहीतरी तो सांगत होता. त्याने धान्याची मागणी केली. कोठार फोडून धान्य घेण्याचा त्यांचा निश्चय दिसला. प्रतिकार करणे शक्यच नव्हते. मी किल्ल्या टाकल्या. दोन लहान मुलांना जवळ घेऊन बसून राहिलो.

 तीन चार तास कोठाराची लूट चालू होती. ५०-६० क्विंटल गहू, ३०-४० क्विंटल ज्वारी असे मिळून सुमारे शंभर क्विंटल धान्य तरी त्या दिवशी लुटले गेले. मी काही हालचाल करू शकत नव्हतो. कारण हातात भाले घेऊन दोनचार जण माझ्या शेजारीच उभे होते.

 गणपत हा सर्व जमावाचा पुढारी. तो इतका दारू पिऊन आलेला होता की, माझ्यासमोर त्याने किलो दीड किलो ज्वारीचे दाणे फस्त केले.

 आवारात सिमेंटची काही रिकामी पोती पडलेली होती. बऱ्याच जणांनी या पोत्यात भरून धान्य नेले. काहींनी धान्य नेण्यासाठी गाड्याही बरोबर आणलेल्या होत्या. घरातल्या व शेतावरच्या गडीमाणसांनाही धान्य बळजबरीने न्यायला लावले.

 नंतर असे कळले की, बाहेर मुख्य रस्त्यावरच्या ट्रक्स व एस. टी. गाड्याही जमावाने अडकवून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे बातमी लवकर पसरली नाही.

 दुपारी ११-११।। पर्यंत हा प्रकार आत चालू होता.

 नंतर लोक गेल्यावर मी शहादे (तालुक्याचे गाव, पाटीलवाडीपासून अंतर सुमारे दहा मैल) पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस पार्टी आली. धान्य घेऊन जाणाऱ्यांपैकी काहींना वाटेतच पोलिसांनी पकडले.

शहादे । ७