पान:निर्माणपर्व.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२. सरकारच्या संस्था व खाती यांच्यामार्फत आदिवासींना देण्यात आलेली कर्जे रद्द करावीत.
३. शेतमजुरीचे किमान दर ताबडतोब बांधून द्यावेत.



 मेळावा आटोपला. रात्रीपासून निवडक कार्यकर्त्यांचे एक शिबिरही सुरू झाले.
 परगावची मंडळी परतली. सोमनाथहुन, मुंबई पुण्याहून आलेले काही तरुण मात्र शिबिरासाठी थांबलेले होते.

 मेळाव्यात ठरलेला कार्यक्रम प्रत्यक्षात अंमलात कसा आणता येईल, अडचणी काय आहेत, कार्यकर्त्यांची शक्ती किती, वातावरण कसे आहे, शासनाची, जमीनदार सावकारवर्गाची भूमिका कोणती राहील-वेगवेगळ्या प्रकारे विषयाची छाननी चालू होती. कोणी तात्त्विक बोलत होते. कुणाचा भर वास्तवावर होता. काहींना तर दुपारची वास्तवताच भेडसावत होती. आज धान्य संपले. शिबिरासाठी जमलेल्या लोकांची दुपारच्या जेवणाची सोय कशी करायची ? भाजीवाल्याचे कालचे पैसे दिल्याशिवाय आज तो भाजी नाही म्हणतो. गावात आता पैसे मिळण्याची सोय नाही. सावकारमंडळी आता सर्वोदयाला नावे ठेवू लागलेली आहेत. मग मुंबईचे दाते-करमरकर उपयोगी पडतात. जीपचा दोन दिवसांचा पेट्रोल खर्च ते पुढे करतात. तेवढ्या पैशांत आजची दुपारची वेळ तरी निभावली जाते.

 फोटोवाला येतो. त्याने आदल्या दिवशीचे, मोर्चा-मेळाव्याचे फोटो काढलेले असतात. हौशीने कुणीतरी सांगितलेले असते. पण बील पाहून मंडळी हबकून जातात. एकशे सत्तर रुपये. कुठून आणायचे एवढे पैसे ?

 भाऊ मुंदडा सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनलच्या पाहुण्याला घेऊन तोरणमाळ-धडगावकडे रवाना झालेले असतात. त्यांच्या सोबत सहज तो भाग पाहावा म्हणून निघालेले असतात, पुण्याचे सुधीर बेडेकर, मुंबईचे लिमये-बिडवाई.

 दाते-करमरकर-राणे या मुंबईच्या मंडळींनीही शहादे सोडलेले असते.

 जानेवारीची ही एकतीस तारीख असते. रात्री शिबिरात चर्चा चालू असते. विषय असतो या भागातील रोजंदारीची परिस्थिती. मेळाव्याने 'काम द्या' अशी मागणी केलेली असते. कुणीतरी माहिती सांगतो - शहाद्यापासून दहा-बारा मैलांवर सरकारने दरा-धडगाव रस्त्याचे मोठे काम काढलेले आहे. पण लोक कामाला जात नाहीत. नासिकहून कामगार आणावे लागतात. असे का होते ? दोघा-चौघांनी समक्ष जाऊन जागेवर चौकशी करून यावी असे ठरते. त्याप्रमाणे श्री. ग. माजगावकर, दिलीप कामत, बाबा दौल्या वळवी, कुमार शिराळकर हे चौघेजण दुसऱ्या दिवशी सकाळी बसने तिकडे जायचे ठरवतात.

निर्माणपर्व । ४२