पान:निर्माणपर्व.pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



भूदानाला-सर्वोदयाला आज एक नवी वाट सापडली होती. भाऊ यामुळेच गहिवरले होते. त्यांच्या तपश्चर्येचे आज सार्थक झालेले त्यांना दिसत होते. भाऊ मुंदडांमुळेच आजचा दिवस या भागात असा उगवला होता. बारा वर्षांपूर्वी ते या अंदमानात आले नसते तर ! बिहारात जसा पूर्णिया तसा महाराष्ट्रात हा सातपुडा. संथाळांप्रमाणेच भिल्लांचीही दिवसाढवळ्या शिकार होत राहिली असती.


 मोर्चाचे रूपांतर मेळाव्यात झाले. एव्हाना दुपारचे दोन-अडीच वाजलेले होते.

 चार तास मेळावा भर उन्हात शांतपणे बसून होता. पाच-सहा हजार तरी लोक असावेत. बहुतेक आपला रोजगार बुडवून आलेले. किंवा कामच नसलेले !

 वक्तेही खूप होते. ठाकुरदास बंग, वसंतराव बोंबटकर, गोविंदराव शिंदे, अंबरसिंग ही सर्वोदयाची आघाडी. दत्ता देशमुख, पन्नालाल सुराणा, बा. न. राजहंस, रतन भतवाल ही राजकारणात वावरणारी मंडळी, सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनलचे कॅनॉस, भूमिपुत्र प्रतिष्ठानचे आबा करमरकर -या सर्वांनीच मेळाव्यासमोर ठेवल्या गेलेल्या कार्यक्रमाला जोरदार पाठिंबा व्यक्त केला.

 कार्यक्रम साधा आणि सरळ होता-

१. ज्या जमिनी आदिवासी खातेदारांच्या नावावर नोंदलेल्या आहेत, पण आज जबरदस्तीने इतर कुणी ज्या कसत आहेत, त्या ताबडतोब ताब्यात घ्या.

२. दहा वर्षांच्या कराराने करायला दिलेल्या जमिनी कराराची मुदत संपल्यावर लगेच ताब्यात घ्या.

३. प्रत्येकाला रोजगार मिळण्याची हमी सरकारने जाहीर केली आहे. तिची अंमलबजावणी ताबडतोब झाली पाहिजे. ही मागणी संघटितरीत्या आंदोलनाच्या मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी, रोजगार नसलेल्या आदिवासींनी ग्राम स्वराज्य समितीच्या कार्यालयावर आपली नावे उद्यापासून नोंदवावीत.

 कार्यक्रमाच्या जोडीने काही मागण्याही शासनासमोर या मेळाव्याच्या द्वारा मांडण्यात आलेल्या होत्या-

१. सर्व गावांना १५ ऑगस्ट १९४७ पासून नवी शर्त सरकारने लागू करावी व गेल्या २५ वर्षातील सर्व जमिनींची हस्तांतरे रद्द करावीत.

शहादे । ४१