पान:निर्माणपर्व.pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



गावोगाव सभा घेतल्या, शिबिरे भरवली, वृत्तपत्रांचे साहाय्य घेतले, समानविचारी व्यक्तींशी व संस्थांशी सहयोग साधला. भू-मुक्तीचा कार्यक्रम सर्वांसमोर ठेवला. सावकारांनी गैरकायदा बळकावलेल्या जमिनी सोडवून घेणे, मुक्त करणे- यासाठी आजचा मोर्चा आणि मेळावा होता. जे गेले सहा महिने सभासभांतून सांगितले त्याचा सामुदायिक पुनरुच्चार आज होत होता.

 मोर्चा मूक होता तरी फलक बोलके होते. 'आम्हाला काम द्या', 'आम्हाला न्याय हवा, भीक नको', 'आमचा मंत्र जय जगत्','आमचे तंत्र ग्रामदान-ग्राम स्वराज्य', 'जागृत जनता अब न सहेगी, धन और धरती बाट रहेगी' - आणखी अशा कितीतरी घोषणा, मागण्या, निर्धार फलकांवर व्यक्त झालेले होते. तुकड्या वाढल्या तसे फलकही वाढले. ज्यांना काठ्याही मिळू शकल्या नाहीत त्यांनी हातांनीच फलक उंच धरलेले होते- फणा नसलेल्या नागासारखे हे हात ! शस्त्र नसलेली ही सेना ! युद्धाला निघालेले हे शांतियात्रिक !

 पण आपल्या श्रमाचे चीज झाले म्हणून सर्वोदयी कार्यकर्ते मनोमनी तृप्त होते. एकेक तुकडी दृष्टीच्या टप्प्यात आली, की अंबरसिंगाचा चेहरा समाधानाने उजळून निघत होता.

 एकजण तर विशेषच गहिवरला. पाडळद्याची तुकडी मोर्चात सामील होण्यासाठी एका वळणावर उभी आहे हे दिसल्यावर! या तुकडीत मुले होती आणि स्त्रियाही होत्या. केवढे परिवर्तन! बारा वर्षांपूर्वी हा इथे आला तेव्हा काय स्थिती होती! शहरी इसम पाहिला, की भिऊन मोठी माणसेही लांब पळत होती. शरीरांचे कोळसे. मने भुताखेतांच्या सृष्टीत वावरणारी. लंगोटीशिवाय वस्त्र नाही. दारू पाचवीला पुजलेली. भाषा वेगळी. मुलुख परका. प्रवास सगळा पायी. तरी हा इथे ठाण मांडून बसला. विनोबांचा देश म्हणून. भूदानाचा पाईक होऊन. आदिवासींसाठी शाळा काढ, स्वस्त धान्याची दुकाने चालव, एक नाही अनेक उद्योग याने आरंभले. काही चालले, काही फसले. तरी याने जागा सोडली नाही. अवमानित, एकाकी. जमीनदार आणि राज्यकर्ते यांच्याकडून होणारे बदनामीचे घाव झेलीत झेलीत हा आपले काम करीतच राहिला. पराभवाच्या वेदनेने हा आतून कितीवेळा तरी ढासळला असेल ! पण आज त्याला आधार सापडला असावा. आपण केलेले सगळेच काही वाहून गेले नाही या विचाराने त्याला खूप सावरले असावे. त्याने पेरलेले थोडेथोडे उगवत होते त्याचा आदिवासी आज जागा झालेला दिसत होता. त्याने हाताशी धरून लहानाची मोठी केलेली आदिवासी मुले आता मोर्चे काढीत होती, मेळावे भरवीत होती. या मोर्चा-मेळाव्यांसाठी लांबलांबहून, शहरातून मंडळी आस्थेवाईकपणे येत होती. वृक्ष वठतो की काय, कोसळून पडतो की काय, अशी भिती होती. आज या वृक्षालाच पालवी फुटलेली होती.

निर्माणपर्व । ४०