पान:निर्माणपर्व.pdf/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



संधिसाधूंंपुढे त्यांचा निभाव लागणार नाही व काँग्रेसच्या शंभुमेळयापेक्षाही हा जनतामेळा लवकर विघटित होईल. काँग्रेसची फाटाफूट झाली असूनही लोकांना असा सारखा भास होतो की, निर्णायक वेळ आली की हे बेटे एकत्र येतील, दुफळी सांधली जाईल आणि काँग्रेसपक्ष पुन्हा एक होईल. तीच गोष्ट कम्युनिस्ट पक्षाबद्दल. एका रात्रीतही दोन्ही कम्युनिस्ट पक्ष एक झाल्याचा चमत्कार घडू शकतो; पण ‘फुटणार नाही, फुटणार नाही' अशी चंद्रशेखर-मोरारजी किताही आश्वासने देत असले तरी, जनता पक्ष फाटाफुटीच्या टोकाजवळ उभा आहे, अशीच सर्वत्र भावना आहे. इंदिरा गांधी एकीकडे 'जनता पक्ष फुटणार नाही' असे म्हणत म्हणत दुसरीकडून जनतापक्षाच्या पायाखालची एकेक वीट सरकवात आहेत. ही स्थिती पालटायची असेल तर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर अधिक भर जिथे तिथे दिला जायला हवा. अंमलबजावणीत कार्यकर्ते गुंतले की, जुने वाद, प्रतिगामी, पुरोगामी वगैरे शुष्क काथ्याकूट करण्यास त्यांना वाव आणि उसंतच मिळणार नाही. कार्यकर्त्यांची नवीन भरती होत राहील, जुन्यांची टोके झिजत राहतील, कार्यानुभूतीमुळे पक्षाची विश्वासार्हता वाढेल. ज्या राज्यात असा अंमलबजावणीचा धडाका सुरू झाला तेथील जनता राजवटीचे यश डोळयात भरण्यासारखे आहे. उदाहरणार्थ, हिमाचलप्रदेश. 'टाइम्स' सारखी एरवी जनता पक्षाबद्दल फारशी उत्साही नसलेली वृत्तपत्रेही ‘outstanding work in Himachal' असे मोठे मथळे देऊन हिमाचल प्रदेशातील एक वर्षाच्या जनता राजवटीची मुक्तकंठाने प्रशंसा करीत आहेत. हिमाचल प्रदेशात विधानसभेचे ६८ मतदार आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान एक तरी नवीन पाणीपुरवठा योजना ७८ अखेर पूर्ण करण्याची जबाबदारी, त्या मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर टाकली गेली; आणि ५०० खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या १५० योजना असा नेट लावून पूर्ण करून घेण्यात आल्या. ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण आरोग्ययोजना अशाच युद्धपातळीवरून राबविल्या गेल्या. गेल्या तीस वर्षात जे घडले नाही ते जनता राजवटीने एक वर्षांत करून दाखविले असे प्रशस्तीपत्र टाइम्ससारख्या विरोधी गटाकडे झुकलेल्या वृत्तपत्राने द्यावे, याला निश्चित अर्थ आहे. नसेल महाराष्ट्रात सत्ता अद्याप जनता पक्षाच्या हाती आली. शंभर मतदारसंघ तर कुठे गेलेले नाहीत ? एकेक मतदारसंघ किल्ला समजून बांधला गेला पाहिजे, त्यासाठी त्या भागातील एखादी विकासयोजना राबवून घेण्याचा आग्रह धरला जायला हवा. उत्तमराव पाटील धुळे जिल्ह्यातल्याच एखाद्या आदिवासी विकासयोजनेसाठी का उठाव करीत नाहीत ? त्यांनी हा सगळा भाग हिंडून पाहिलेला आहे. एस्. एम्. जोशी व अन्य जनतानेत्यांनाही या भागातील परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे. दहा दहा मैलांवरून पिण्याचे पाणी आणावे लागते, अशी गावे अद्याप तेथे किती तरी आहेत. रस्ते नाहीत.

निर्माणपर्व । १८६