पान:निर्माणपर्व.pdf/170

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "'मनु' शासन पर्वाकडे” हे संपादकीय-
 हा सगळा अंकच स्फोटक होता.

 रसेलनंतर कुरुंदकरादिकांचे स्वातंत्र्यविषयक लेख-
 स्वामी रामानंदतीर्थाच्या विस्मृत कार्याची ओळख-
 श्री. मा. भावे यांनी महाभारतातील कथांतून सांगितलेले आधुनिक भारत-
 प्रा. बिवलकर यांनी केलेले वीस कलमी कार्यक्रमाचे परखड विवेचन-
 ‘कोणीतरी रानडुकराच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत करायला हवी, ' राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली माझ्या राष्ट्राच्या रंगभूमीचा गळा दाबण्यात आला आहे' असे भेदक मथळे-
 धारियांची तुरुंगात घेतलेली मुलाखत-
 ‘आचार्य विनोबांचे निवेदन स्वीकारून आणीबाणी उठवा,' अशी संपादकीयातून केलेली स्पष्ट मागणी-
 रत्नाकर महाजनांनी दिल्लीमधील विचारवंत-कार्यकर्ते यांच्या घेतलेल्या लोकशाही संघटकांच्या मुलाखती-
 'बकऱ्याची गोष्ट' सारखी एखादी उपरोध कथा-
 संजय गांधींचा भस्मासूर याच सुमारास उदयास येत होता. वृत्तपत्रातील त्यांची मोठमोठी छायाचित्रे आणि भाषणाचे अहवाल वाचून आतल्या आत माणसे चडफडत होती. सार्वत्रिक लाचारीची किळस वाटू लागली होती. या परिस्थितीत 'माणूस' मधील ‘संजयोवाच' या उपरोधिक स्फुटाचे वाचकांकडून प्रचंड स्वागत व्हावे, यात नवल नाही. तोवर मराठीत तरी संजयस्तोमाची अशी टर उडवणारे, त्यांची खरी लायकी त्यांना दाखवणारे एक अक्षरही कुठे प्रसिद्ध झालेले नव्हते. नंतरही नाही. त्यावेळी जो भेटेल तो कळवत होता-'माणूस' सर्वांच्या मनात जे डाचत होते, ते व्यक्त केले. लेखक कोण म्हणून चौकशी सुरू झाली. 'बकऱ्याची गोष्ट' आणि ' संजयोवाच' या दोन स्फुटांवर शासनाची विशेष नजर होती. त्यावर लेखकाचे नाव दिलेले नव्हते. आता ते जाहीर करायला हरकत नाही. वि. ग. कानिटकरांनी ही दोन्ही स्फुटे लिहिलेली होती. खूप दडपणे आली. 'माणूस' कचेरीत काम करणा-यांकडून लेखकाचे नाव काढून घेण्याचेही विश्रामबाग पोलिसांकडून (L.I.B.) प्रयत्न झाले. पण पोलिसांची डाळ मुळीच शिजली नाही.

चित्त हवे भयशून्य । १६९