पान:निर्माणपर्व.pdf/169

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 याच सुमारास सायक्लोस्टाइल्ड पत्रके, लेख वगैरे ‘भूमिगत' मजकूर बराच येत होता. एका पत्रकात ना. ग. गोरे यांचे आणीबाणी विरोधाचे लोकसभेतील भाषण सविस्तर दिलेले होते. त्यातील एक वाक्य छापण्याचा मोह अगदी अनावर झाला. ना. ग. गोरे यांनी या भाषणात सताधारी पक्षाला टोमणा मारला होता-
 'लोकशाही ही बुरखाधारी स्त्रीसारखी असावी काय, की तिला इतर कोणी पाहू नये, स्पर्श करू नये, केवळ सत्ताधारी पक्षालाच तिच्याबरोबर बोलता यावे ? '
 लोकसभेतील भाषणे, भाषणातील काही भागसुद्धा छापण्यास तेव्हा बंदी होती. पण 'ना. ग. गोरे यांच्या नवी दिल्ली येथील एका अप्रकाशित भाषणातून...' असा मोघम संदर्भ देऊन वरील वाक्य 'माणूस' ने मुखपृष्ठावरच छापून टाकले. हा अंक होता २७ डिसेंबर १९७५ चा. आणीबाणीची पहिली सहामाही जेमतेम पूर्ण झाली होती. वातावरण किती तंग होते. हवेत किती घबराट होता, हे सांगायला नकोच. तरीही वाटले होते, ही वाक्यप्रसिद्धी दुर्लक्षिली जाईल पण अंदाज चुकला, सेन्सॉरने कान पकडला. कळविले-
 'आपल्या दिनांक २७ डिसेंबरच्या अंकातील मुखपृष्ठावर आपण खासदार श्री.ना ग.गोरे यांच्या भाषणातील एक उतारा संदर्भविरहित व भडकपणे उद्धृत केला आहे.
 ‘सदर बाब ही गाईडलाईन्समधील सूचनांशी विसंगत असून आक्षेपार्ह आहे. याची आपण नोंद घ्यावी व इतःपर याबाबतीत खबरदारी घ्यावी.'

 ‘माणसातील अपूर्वाई बुद्ध्याच वा बेपर्वाईने चिरडून टाकणारा समाज पुरता मुर्दाड आणि पूर्वपरंपरावादी, गतानुगतिक बनतो. त्या समाजाची प्रगती खुटते, किंबहुना अशा समाजाच्या स्वतंत्र अस्तित्वाचे प्रयोजनच नाहीसे होते'... नवीन वर्षाची (७६) ची सुरुवात. थोर व्यक्तिस्वातंत्र्यवादी विचारवंत बट्रांंड रसेल यांचे लिखाण माणूसमधून प्रसिद्ध होऊ लागले. वरील अवतरण मुखपृष्ठावर दिले होते! "

 याच ३ जानेवारी अंकात देवीदास बागुल यांचे 'झेड' या चित्रपट, परीक्षण आहे. 'एकला चलो रे' चे निखळ धैर्य दाखवणारा एक न्यायाधीशचं पोलीस-राजकीय गुंड यांच्या दडपणाला बळी न पडता निर्भयपणे खरी साक्ष देणारा एक सामान्य कामगार. सर्व समाज मुर्दाड बनला तरी माणसातील चैतन्य जागे आहे, ही श्रद्धा जागवणारी ही चित्रपटकथा...

निर्माणपर्व । १६८