पान:निर्माणपर्व.pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या स्वावलंबनाच्या आघाडीवर अपयश येत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. खरे तर इंदिरा गांधी ज्या पद्धतीने राज्यकारभार करीत आहेत ती पद्धत राष्ट्रीय एकात्मतेलासुद्धा फार मारक ठरण्याची शक्यता आहे. राज्याराज्यांमध्ये परस्पर सहकार्याची, विश्वासाची भावना त्या आजवर निर्माण करू शकलेल्या नाहीत. पं. नेहरू, गांधीजी यांच्याप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाला नैतिक-सांस्कृतिक अधिष्ठानही नाही. सत्ता हस्तगत करण्याचे, ती राबवण्याचे एक तंत्र त्यांना अवगत आहे आणि केवळ या तंत्रबळावर विसंबून त्या काँग्रेस पक्षाची व देशाची एकात्म प्रतिमा टिकवू पाहत आहेत. त्यामुळेच ती केव्हा धोक्यात येईल, सत्तास्पर्धा एकात्मतेचा केव्हा बळी घेईल याचा काही नेम सांगता येत नाही. परचक्रनिवारण हे एकच इंदिरा गांधींचे खरे प्रभावक्षेत्र आहे. या क्षेत्रातील त्यांंचे यश मात्र वादातीत ठरलेले आहे. जगानेही या यशाला मान्यता दिलेली आहे. प्रश्न असा आहे की, हे यश इतर कुणी हस्तगत करू शकणार नाही का ? शास्त्रीजींना हे यश जेव्हा मिळाले तेव्हा पं. नेहरूंसारखी कुठलीही आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय प्रतिमा शास्त्रीजींजवळ नव्हती. तरी ६५ साली त्यांनी पाकिस्तानचे आक्रमण परतवून लावले. इतकेच नव्हे तर जे करणे नेहरूंना कधीही जमले नाही, जमण्यासारखे नव्हते, ते लाहोरकडे फौजा घुसवण्याचे साहसही शास्त्रीजींनी करून दाखवले. या यशामुळे काही काळ तर शास्त्रीजींची प्रतिमा जनमानसात नेहरूपक्षाही अधिक उजळली होती. हा इतिहास अगदी ताजाच आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती होणारच नाही असे आपण का मानून चालावे ? उद्या यशवंतराव चव्हाण किंवा जगजीवनराम किंवा अगदी मधु लिमये,अटलजीदखील हा पराक्रम गाजवू शकतील- प्रसंग आल्यावरच नेतृत्वही उभे राहात असते ना ? उलट टोकाला जाऊन धोकेबाज व धक्काबाज राजकारण करण्याच्या इंदिरा गांधींच्या शैलीपेक्षा, समंजस, मध्यममार्गी व सर्वांचा विश्वास व सहकार्य संपादन करू शकणारे प्रगल्भ नेतृत्व आणीबाणीच्या काळात अधिक ठरण्याची शक्यताही दृष्टिआड करून चालणार नाही. आपल्या तीन गरजांपैकी दोनन गरजा भागवणारे नेतृत्व आजही काँग्रेस पक्षात व बाहेरही पुरेशा प्रमाणात आहे. वानवा आहे ती तिसऱ्या गोष्टीची. इंदिरा गांधीही येथे अपूऱ्या ठरल्या आहेत. कारण आपले आर्थिक स्वावलंबनाचे प्रश्न केवळ आर्थिक क्षेत्रातील उपाय योजून सुटण्यासारखे नाहीत. काही सांस्कृतिक-नैतिक जाणिवा यासाठी जनमानसात निर्माण कराव्या लागणार आहेत. त्यागाचे, विधायक पुरुषार्थाचे, ध्येयवादाचे एक नवेच आवाहन त्यासाठी आवश्यक आहे. हे आवाहन केवळ सत्तातंत्रात या इंदिरा गांधींसारख्या व्यक्ती करू शकणार नाहीत. केले तरी अशांची आवाहने जनता मानणार नाही. मग इंडिया इज इंदिरा या समीकरणात अर्थ तरी काय उरला ?

-८

आपल्या तीन गरजा । ११७