पान:निर्माणपर्व.pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संघर्षवाहिनीत भरती झाला, खेडोपाडी जाऊन नवनिर्माण कार्यात त्याने स्वतःला झोकून दिले तर उत्तमच. संघर्षाचे आणि निर्माणाचे प्रत्यक्ष कार्य, हे फार मौलिक शिक्षण ठरेल. त्या विद्यार्थ्यांचे जीवनच बदलून टाकणारा हा प्रयोग मानावा लागेल. असे प्रत्यक्ष क्रांतिकार्य हे जीवन शिक्षणाची एक महान प्रयोगशाळाच असते आणि अशा शाळांतून विद्यार्थी बहुसंख्येने बाहेर पडले तर समाजजीवनाची एकूण स्तरच उंचावतो, नया बिहार बनाना है, नया देश बनाना है, हा या जीवनशिक्षणाचा प्रेरक मंत्रच यासाठी ठरायला हवा. पदवी शिक्षणाचा मोह टाळून, वर्ष-दोन वर्षासाठी, असा नवा देश बनवण्यासाठी बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी, मग छोटे छोटे अभ्यासक्रम ठरवावे लागतील. तात्पुरती खुली विद्यापीठे यासाठी चालवण्याची गरज निर्माण होईल. नव्या शिक्षणपद्धतीचा आकृतिबंध वगैरे अशा जिवंत प्रयोगांतूनच हळूहळू स्पष्ट होत राहील. पदवीप्रधान चालू शिक्षणपद्धतीवरही या खुल्या प्रयोगांचा इष्ट तो परिणाम होईल.
 जयप्रकाशांची आर्थिक क्रांतीची बाजू दुबळी वाटते. आर्थिक कार्यक्रम जाहीर केला तर आज बरोबर आहेत ते पक्ष, सहकारी सोडून जातील असे भय त्यांना वाटते का ? जानवे तोडा असे त्यांनी सांगितले, तेव्हाही काहीजण निघून जाण्याचा धोका होताच. तो त्यांनी जसा पत्करला, तसा आर्थिक कार्यक्रमाबाबतही पत्करायला हवा. जयप्रकाश एकेकाळचे समाजवादी. नंतरचे सर्वोदयी. तेव्हा आर्थिक कार्यक्रमाबाबत तर त्यांनी सर्वप्रथम आग्रह धरायला हवा. बिहारमधील जमीनदा-या, हे त्यांच्यासमोर उभे असलेले केवढे तरी मोठे आव्हान आहे. आपल्या अनुयायांना हे आव्हान पेलायला ते प्रवृत्त करणार आहेत की नाही ? माओची लाल सेना खेड्यात पोचली की, त्या खेड्यातील जमीनवाटपाचा कार्यक्रम लाल सैनिक प्रथम हाती घेत असत. जयप्रकाश असा काही कार्यक्रम आपल्या संघर्षवाहिनीसमोर ठेवणार आहेत की नाही ? साठेबाज व्यापारी, भ्रष्ट नोकरशाही, काळाबाजारवाले, समाजकंटक, यांच्यावर संघर्षवाहिनी तुटून पडणार आहे की नाही ? राजकीय पक्षांप्रमाणे एखादा जाहीरनामा काढून आर्थिक कार्यक्रमांची खैरात जयप्रकाशांनी मांडावी अशी अपेक्षा नाही. परंतु जेवढी राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रात त्यांनी स्पष्टता दाखवली, काही आग्रह धरले, तसे आग्रह आर्थिक क्षेत्रातही त्यांच्या कडूनधरले जायला हवे आहेत. त्याशिवाय त्यांचा संपूर्ण क्रांतीचा रथ पुढे सरकणार नाही; या रथाचे एक चाक जमिनीत कायमचे रुतलेलेच राहील.

 जयप्रकाशांचे वय आणि प्रकृती हा संपूर्ण क्रांतीच्या रथयात्रेतील एक मोठा अडथळा आहे. त्यांच्या अगदी निकटच्या सर्वोदयी आणि समाजवादी वर्तुळात कुणी त्यांचे

साम्यवादी पर्याय नको असेल तर ! । १०७