पान:निर्माणपर्व.pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थान घेऊ शकेल अशीही शक्यता दिसत नाही. अशा व्यक्तीजवळ दोन-तीन वैशिष्ट्ये किमान हवीत. अखिल भारतीय मान्यता, पक्षाभिनिवेशाचा अभाव आणि चारित्र्यसंपन्नता. या दृष्टीने अटलबिहारी वाजपेयी-मधु लिमये ही नावे चटकन डोळयासमोर येतात. लोकसभेचा राजीनामा देऊन बाहेर पडण्याची अटलजींची घोषणा प्रत्यक्षात उतरली असती, तर यांचे स्थान जनमानसात एकदम उंचावले गेले असते व जयप्रकाशांच्या आंदोलनानेही अधिक गती घेतली असती. आता तरी या दोघांनी लोकसभेला काही काळ रामराम ठोकून, मधु लिमयांनी बिहारमध्ये व अटलजींनी मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशमध्ये जयप्रकाशधर्तीचे पक्षातीत जनआंदोलन संघटित करण्याचे काम तात्काळ हाती घ्यायला हवे आहे. मनूचा मासा जसा विहिरीतून तळयात, तळयातून नदीत व नदीतून समुद्रात जातो, तसे हे दोन मासे आता आपापल्या पक्षांच्या नद्यांतून बाहेर पडून विशाल जनसागरात एकरूप व्हायला हवे आहेत. जयप्रकाश उभे आहेत तोवरच हे नवे नेतृत्वही जनमानसात स्थिरावले जायला हवे. म्हणजे संपूर्ण क्रांतीच्या रथयात्रेत खंड पडणार नाही व तिचा आकार व आशयही वाढत राहील रा. स्व. संघाचाही या दृष्टीने पुनर्विचार व्हायला हवा. दुसरी कुठलीही अखिल भारतीय संघटना हे शिवधनुष्य उचलण्याइतकी समर्थ नाही. गांधीजींची लोकसेवक संघाची कल्पना रा. स्व. संघच आज प्रत्यक्षात आणू शकतो. गांधीजींनी ४८ साली मांडलेली लोकसेवक संघाची कल्पना गुरुजींनीही त्यावेळी उचलली होती; समाजपरिवर्तनाची ही खास भारतीय पद्धती आहे, असा अभिप्राय गुरुजींनी तेव्हा व्यक्त केलेला होता. वरवरचे मतभेद आणि आकृतिभेद, या पलीकडे जाऊन भिन्न भिन्न परंपरांमधील समान आशय शोधण्याची दृष्टी बाळगली तर, एके काळी परस्परविरोधी असणारे किती तरी प्रवाह आज एकत्र आणता येतील. या सर्व प्रवाहांचा 'नया देश बनाना है' यासाठी उपयोग करून घेता येईल. या दृष्टीने संघाची परंपरा गांधीजींच्या विचारधारेला फार जवळची आहे. संघानेही यासाठी आपल्या परंपरेचा पुन्हा एकदा शोध घ्यायला हरकत नाही. या परंपरेतील कालबाह्य भाग कोणता, चिरकालीन महत्त्वाचा कोणता, हे ठरवून, त्या दृष्टीने आपल्या विचारांची, आचारांची पुनर्मांंडणी संघाकडूनही अपेक्षित आहे. मुसलमानांबद्दलचा आपला जुना दृष्टिकोन तर संघाने तात्काळ सोडायला हवा. हा या दशकाचा मुख्य प्रश्नच राहिलेला नाही. स्वातंत्र्यपूर्वकाळात हा प्रश्न होता व त्या काळात सावरकर-हेडगेवार यांनी या प्रश्नाला महत्त्व देणे अगदी अवश्य व योग्यच होते. त्या काळात सर्वसामान्य हिदू भेकड होता व मुसलमान शिरजोर व आक्रमक होता. आता हिंदू भेकडे नाही व मुसलमानांनाही, त्यांची शिरजोरी महागात पडते असा अनुभव अनेकवार, अनेक ठिकाणी येऊन चुकलेला आहे. आता हिंदू संघटनवाद्यांनी राष्ट्रासमोरील तर आव्हाने महत्त्वाची मानली पाहिजेत आणि हिंदू-मुसलमान प्रश्नाला जरा दुसरे-तिसरे स्थान द्यायला हवे.

निर्माणपर्व । १०८