Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१६

मनुष्य आत्मदर्शनास पात्र होतो. आत्मदर्शन झाल्यावर हृदयग्रंथि तुटते सर्व संशय नष्ट होतात, नैष्कर्म्यसिद्धि प्राप्त होते, व देवांत आणि भक्तांत भेद उरत नाही. साधक द्वैतापासून अद्वैतास, आकारापासून निराकारास, स्वरुपापासून ब्रह्मस्थितीस सहज प्राप्त होतो.

 श्रीभाऊरावमहाराजांची जी एवढी योग्यता आहे ती केवळ ते आत्मज्ञानपारंगत झाले आहेत म्हणून होय. सर्व उपनिषदांचें जे मुख्य सार तें त्यानी स्वानुभवास आणले आहे. त्यांनी प्रत्यक्ष उपनिषदें वाचलीं नसतील, पण त्यांनी उपनिषदांच्या बापास आपल्या कंठांत साठविलें आहे. श्रीतुकाराममहाराजांनी म्हटले आहे:-

 "वेद आम्हांवरी रुसोनिया गेला। आम्हीं त्याच्या बाला धरिलें कंठीं॥" आत्मज्ञानास शब्दज्ञानाची मदत होते पण आवश्यकता नाहीं, हें तत्त्व जे सदैव उराशी बाळगतील त्यांसच निःशब्दज्ञानाची प्रीति उत्पन्न होऊन बुद्धीहूनहि पर जो परमात्मा त्यास प्राप्त होण्याचा मार्ग सांपडेल. ईश्वराचें नाम घेतलें असतां रूप सहजींच प्रकट होणार आहे; अहर्निशी नाम घोकिलें असतां देवास भक्तांपासून अन्यत्र जातांच येत नाहीं! वनांतरांस जाऊं नका, बैसले ठायीं तुम्हांस श्रमाचें फल प्राप्त होईल.