Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
कोल्हापुर-प्रकरण व केसरीवरील संकट.

काळांत लोकांस परिस्थितीचें सम्यक् ज्ञान करून देण्यास वृत्तपत्रांशिवाय अन्य सुंदर साधन नाहीं. केसरीची गर्जना आणि मराठ्याचा हरहर महादेव घुमूं लागला. तरुणांचीं अंतःकरणें थरारून जाऊं लागली. या वेळेस केसरीचे संपादक आगरकर होते आणि मराठ्याचे टिळक होते. टीका करण्यास उभयतांही भीत नसत, गोरे अधिकारी किंवा काळे या दोघांचाही खरपूस समाचार घेण्यास ते कचरत नसत. १८७० पासून टिळकांचें कोल्हापूरकरांच्या राज्याकडे लक्ष होतें. १८७० मध्ये पहिले राजे निवर्तले. त्यांच्या दोन राण्या होत्या. वडील राणीस दत्तक देऊन कारभार सुरू झाला. परंतु या नवीन राजास नीट वागविण्यांत येत नाहीं अशी ओरड ऐकू येऊ लागली. त्यास सक्तीनें दारू वगैरे पाजतात आणि त्यास वेडा ठरवून नवीन दत्तक गादीवर बसवावयाचें कारभाऱ्यांच्या मनांत आहे, अशीही दाट वदंता महराष्ट्रांत उठली. १८८१ च्या २४ नोव्हेंबर रोजी रा. ब. गोपाळराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यास जाहीर सभा भरून निषेध व्यक्त करण्यांत आला. पुढे टिळक व आगरकर यांस तीन पत्रे उपलब्ध झाली. आणि कारभारी बर्वे यांच्यावर विष घालण्याचा आरोप त्यांनीं केसरी व मराठ्यांतून प्रसिद्ध केला. कारभारी बर्वे यांनी फिर्याद केली. हीं पत्रे नाना भिडे नांवाच्या गृहस्थानें आकसाने लिहिली होती असें सिद्ध झालें. टिळक आणि आगरकर यांची बाजू तेलंग आणि मेथा यांनीं मांडिली होती. टिळक व आगरकर यांनी माफी मागितली, परंतु बर्व्याचें समाधान तेवढ्यानें होईना. शेवटी १७ जुलै रोजीं त्यांस १०१ दिवसांची शिक्षा झाली. त्यांच्यावर दोष इतकाच ठेविला होता कीं, त्यांनी सदरहू पत्रे विचार न करितां छापिली. या संपादकद्वयास शिक्षा झालेली ऐकून प्रत्येकास सहानुभूति वाटली. सातारच्या वंशजासाठी ते झगडले, कारागृहांत गेले. त्यांस कांहीं स्वतःचा फायदा मिळवावयाचा नव्हता. त्यांचे ठिकठिकाणी अभिनंदन करण्यांत आलें आणि त्यांच्यासाठी फंड सुरू झाला. कोल्हापुरकरांचा या बाबतींत जास्तच जिव्हाळ्याचा संबंध. तेथील राजाची तरफदारी या स्वार्थत्यागी वीरांनी केली होती. राजाराम कॉलेजांतील विद्यार्थ्यांनीं फंडासाठी नाटक करावयाचें ठरविलें, गोपाळ