Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०९
गोखल्यांची विलायतेतील चळवळ.

उदारमतवाल्यांचें फारच मताधिक्य झालें होतें. अशा वेळीं हिंदुस्तानांतलीं दुःखेंही समर्पक व हृदयस्पर्शी भाषेत सांगणे फार हिताचें होतें.
 गोखल्यांनीं इंग्लंडमध्यें अविश्रांत चळवळ केली. हिंदुस्तानांतील साग्र हकीकत त्यांनी करुण रवानें गाइली. मँचेस्टर येथे ६ आक्टोबर १९०४ रोजी त्यांनीं हिंदुस्तानांतील असंतोष या विषयावर सुंदर व्याख्यान दिलें. हें व्याख्यान व्यापाराची मोठी पेठ जी मँचेस्टर तेथें होतें! मँचेस्टर आणि लिव्हरपूल यांस हिंदुस्तान म्हणजे बाजारपेठ, हिंदुस्तान त्यांच्या पोटास देत होता. परंतु हिंदुस्तानांत आतां या मालावर बहिष्कार पुकारण्यांत आला होता. गोखल्यांस त्यांचे मित्र सांगत होते कीं, तुम्ही तेथे व्याख्यान देण्यास जाऊं नका. तेथील लोकांची मनें हिंदुस्तानाविरुद्ध क्षुब्ध झाली आहेत. परंतु गोपाळारावांस कर्तव्य करावयाचें होतें, सर्वांची सहानुभूति त्यांस मिळावावयाची होती. त्यांनी बंगालची फाळणी करण्यांतील धोरण येथे उघड केलें. बंगाली लोक एके ठिकाणी असल्यामुळे त्यांचे सर्व देशांत व त्या प्रांतांत फार वर्चस्व आहे. बंगाली लोकांमधील ऐक्यवृत्ति, व त्यांच्या वाढत्या राष्ट्रीय आकांक्षा चिरडण्यासाठीं, बंगाली लोकांची संख्या दोन निरनिराळ्या प्रांतांत विभागून त्यांचें प्रत्येक प्रांतांत संख्याबल व त्यामुळे मतबल कमी करणें हा सरकारचा हेतु होता. बंगाली लोक हाडाचे गरीब, ते बुद्धीनें कोणास माघार न जाणारे, देशप्रेमाने ओथंबलेले. सरकारचे कृष्णकारस्थान कळतांच त्यांचे उघडूं लागणारे डोळे साफ उघडले. त्यांस त्वेष आला. आम्हां लोकांस या सरकारने एकाद्या किड्यामुंगीप्रमाणे मानून चिरडावें याची त्यांस चीड आली. स्वतःमधील दैन्य, स्वतःमधील दुर्बलता नाहींशी करण्याचा त्यांनी चंग बांधला. इंग्लंडमधील लोकही आपल्या न्याय्य आकांक्षा परिपूर्ण करण्यास पुढे येत नाहींत. त्यांनी पुढे यावें म्हणून बंगाली लोकांनी ब्रिटिश मालावर बहिष्कार पुकारला. या गोष्टीमुळे मँचेस्टर वगैरे शहरांतील लोकांस आम्हांस रागच आणावयाचा होता. गोखले सांगतात.-
 'I am not sorry that you are angry, because I want you to be angry, but I want you to turn your anger not against the helpless people who have been driven to the last possible