पान:दुखहरण (Dukkhaharan).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

का? पण त्याला एकच उपाय ठरतो... नियम करणा-यांच्या पोटी अशी बाळं येणं... त्याशिवाय डोळे कसे उघडणार?
 वल्लरीच्या अडचणी जेन्युइन होत्या... दया म्हणून नको... अपंगांना विकासाची संधी हवी, क्षमतानिहाय संधी हवी होती... ती कधी मिळायची... कधी नाही... पण हळूहळू आम्ही विद्यापीठाच्या गळी उतरवू शकलो... नियम बदलत गेले... संधी... सवलत मिळत गेली... आज वल्लरी संस्कृत घेऊन एम. ए. आहे. फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन... मी कुलगुरु झालो असतो, तर वल्लरीसाठी खास पदवीदान समारंभ योजला असता... अन् आता तर वल्लरी चक्क संगणकाशी झटापट करते आहे.. तिला बोलता येणार नाही, चालता येणार नाही म्हणून भविष्यवाणी करणारे डॉक्टर वल्लरीला पाहतात तेव्हा त्यांना आपल्या पारंपरिक भाकितांची शरम वाटते. आता ते असा पेशंट आला की, भाऊंकडे पाठवतात... म्हणतात, काहीही अशक्य नाही.. ‘धीर धरी रे धीरापोटी! असती मोठी फळे गोमटी।।' मतिमंद मूल पोटी आलं म्हणून हादरणाच्यांना वल्लरी वादळातही प्रकाशाच्या दिशा दाखवते, कळी खुलू शकते, असा विश्वास देते.

 वल्लरी आता चाळिशीत आहे... भाऊ, ताईंना सहस्त्रचंद्रदर्शन योग... आत्याबाईंना नाबाद शंभरावा प्रयोग, वल्लरी संगीत संस्कृत शिकणा-यांचं फोनवरून शंका समाधान करते... तिची फोन इन ट्यूशन फॉर्मात आहे... सत्यालाही विचलित होण्याचा भ्रम व्हावा अशीच सारी स्थिती... या पार्श्वभूमीवर आरक्षणही तोकडे, ठेंगणं वाटतं... आकांक्षापुढती इथं गगन ठेंगणं... मग आठवतात सर्व काही असताना काही न करणारे लोक. कुंथत, कण्हत जगणारी माणसं... त्या सर्वांनी वल्लरी संजीवनी गुटी घ्यावी... तिचा मृत्युंजयी फॉर्म्युला आचरावा... मग प्रत्येक माणूस कर्मवीर... माणसं वाचावीर अधिक असतात... त्यांना वल्लरी, भाऊ, ताई, आत्या सान्यांकडून एक शिकावं... भीक नाही मागायची... हक्क मागायचा... मिळेपर्यंत झगडायचं, लढायचं. “कोण म्हणतं देत नाही... घेतल्याशिवाय राहत नाही' असा पुरुषार्थ, आत्मविश्वास प्रत्येक भारतीयात येईल तर भारत खचितच महासत्ता होईल! या तर, वल्लरीला एकदा भेटू... न पेक्षा तिची कर्मकहाणी वाचू या... 'फिटे अंधाराचे जाळे' हे तिच्याविषयीचं पुस्तक म्हणजे जीवन संजीवनीच!

दुःखहरण/६३