पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वरूपातच विचार त्यांच्या कवितेत व्यक्त होतो, असे उत्तमोत्तम काव्याचे छोटे छोटे स्वयंपूर्ण तुकडे या पुस्तकात इतस्तत: विखुरलेले आहेत. ते पाहिले म्हणजे आमटे यांच्या कवित्वशक्तीचा प्रत्यय येतो. एके ठिकाणी ते म्हणतात, 'पंखांना क्षितिज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कवेत मावणारे आकाश असते', 'काही पंख आपल्या जरत्कारू अस्तित्वाच्या मुद्रेवर सौंदर्याचे सुतक मिरवीत असतात. ते म्हणतात, 'वादळाला फक्त विध्वंसाचे वेड असते. पण चंद्रकोराच सौम्य सामर्थ्य सागराला उकळी आणते.' महात्म्यांच्या वारसांच्या विषयी आमटे म्हणतात, 'गुलमोहराची सर्व झाडे त्यांनी छाटून टाकली. आपल्या लुकड्या कुड्यांच्या कुपीत हे विराट जीवन कोंडून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला, नद्यांना चवचाल वळणे घेण्याची त्यांनी बंदी केली. जुन्या जखमा चिवडीत बसण्याची आमटे यांची इच्छा नाही.' ते म्हणतात, 'बुजलेल्या व्रणांचे तोंड उसवत मला आता बसायचे नाही. आणि कणाकणात स्वप्ने पेरून रात्रही झिंगवायची नाही. हृदयावरच्या जुन्या जखमा स्मृतींच्या गिधाडाला खाऊ देण्यात काय अर्थ?' सत्याच्या दाहकतेचा अनुभव आमटे यांनाही असला पाहिजे. 'व्यथेच्या पेल्यातून सत्याचे घोट घेताना धीट ओठही कापतात' ही कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्या एका कवितेत गर्भवतीचे वर्णन आहे. ते म्हणतात, 'हसण्यात सर्वस्व हरवलेल्या कफल्लकांना अश्रू किती समृद्ध असतात हे तिने दाखविले.' 'वेदनेचा वर नसलेले शरीर उन्मत्त होते. व्यथेच्या पावसात चिंब भिजून ते विशुद्ध होते' ते एक आकाशातले पाखरू होते. 'त्या जुईला स्वत:चा सुगंध जड झाला होता. 'ती स्वत:च समर्पणाची ओंजळ झाली होती' ते म्हणतात, 'ज्यांचे काळीज कळकळीचे असते, ज्यांच्या स्वप्नांना तडे पडतात त्यांनी काळ सोडून इतके पुढे जायचे नसते.' जीवनाला भव्य करणारी गीते अशीच ज्वलज्जहाल असतात. 'त्यांना फक्त वेदनेचा विषण्ण ताल तोलू शकतो.' जी युगे आपल्या प्राचीन प्रेताचे पूजन करत बसतात, त्यांना भवितव्य नसते. 'शिवधनुष्याचा महिमा गाणारे त्याला उचलू शकत नाहीत.' इतिहासात रेंगाळणारे इतिहास घडवू शकत नाहीत. वरील दिलेल्या ओळीमधून विचारच आहेत. पण त्यामागील उत्कटता जाणवत राहते. ही शैली असणाऱ्या आमटे यांच्यामध्ये कवी नाही असे कोण म्हणेल? पण ते जिला कविता म्हणतात, त्यातील प्रवचनांचा फापट-पसारा दूर करता आला पाहिजे. मधून मधून पूर्ण कविताही चार-दोन ओळींत आमटे यांनी लिहून टाकल्या आहेत. उदाहरण म्हणून पुढील कविता पाहण्याजोगी आहे :-

ज्वाला आणि फुले / २३