पान:तिच्या डायरीची पाने.pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सासरा, नवरा ... सासू यांनी तिला मारहाण करून पहाटेच्या अंधारात बाहेर काढले. जीव देणे अवघडच असते. जीवाची आशा कोणाला नसते? निर्मला पाय ओढीत वडिलांच्या मित्राच्या जावयाकडे वहिणीच्या मैत्रिणीकडे गेली. तो औशातच राही. तिची दशा पाहून मित्राची मुलगी व जावई द्रवले. तो दिवस तिने त्यांच्या घरीच काढला. जावयाने तात्काळ सासऱ्यांना व निर्मलाच्या वडिलांना बोलावून घेतले. त्याच काळात जिल्ह्याला अत्यंत कर्तव्यदक्ष पोलिस प्रमुख लाभले होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट निर्मलाच्या वडिलांनी घातली. त्यांनी प्रकरणाची शहानिशा करून सुधाकरची प्रशिक्षणासाठी झालेली निवड रद्द केली. सुधाकरला तात्काळ घरी पाठवले.
 निर्मलाला घेऊन वडील मांडव्याला परतले. मांडवा डोंगरातलं लहानसं खेडं. मातोळे पाटलांच्या घरातला हा वखेडा कुणालाच माहीत नव्हता. माहेरवाशीण चार दिवसांसाठी आली तर लाडाकोडाची. पण महिनोन्महिने राहिली तर त्याची चर्चा होते. घरच्यांना टोमणे बसतात. तसेच होऊ लागले. त्यात सुधाकरच्या बापाचा… सासऱ्यांचा दोनदा सांगावा आला. निमूच्या सवतीला … मावसनणंदेला त्यांनी परत पठवले होते. निर्मलाने परत यावे असा आग्रह त्यांनी धरला. घरी आई नि मोठी बहीण म्हणत की बाईचा हट्ट किती चालणार? शेवटी मारतो आपलाच नवरा. बाहेरचा तर कोणी मारत नाही ना? नवराच बायकोवर हक्क दाखवणार. निमूलाही सुधाकराची आठवण येई. कित्येक दिवसात.... कित्येक महिन्यात.... दोन वर्षात त्याची संगत मिळाली नव्हती. सासऱ्यांचा सांगावा तिने झेलला. आईकरवी वडिलांना निरोप दिला की औशाला नेऊन घाला, पोचती करा. नाहीतरी म्हणतातच की बाईचा जलम, चुलीतल्या ढलपीचा, मुक्याने जळतांना राख व्हावे. निमूची औशाला पाठवणी झाली. सासरचे वातावरण होते तसेच होते. ती दुसरी बया बरीक नव्हती. सासरा गोडीने सांगे की झालं गेलं विसरून जा. जर तू औरंगादबादच्या मोठ्या सायबांना सांगितलं तर सुधाकरला परत ट्रेनिंगला घेतील. ट्रेनिंग संपलं की बदलीच्या जागी नवं घर करून देऊ. सासूचा त्रास सुटेल. नवा संसार सुरू होईल. सुधाकर ही हेच सांगे. कधीकधी कांगावा करी.

 निमू सासरी परतल्यानंतरची दोन वर्षे माहेरशी संबंध नव्हता. ना माहेरी

७०
तिच्या डायरीची पाने