पान:तिच्या डायरीची पाने.pdf/७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाजूला काढून ठेवायची. मला वाटायचं की वडील भैनीप्रमाणे करतेय. पण झालं वेगळंच… ताई नसिबाचे भोग बरे म्हणायचे, एवढा या शरीराचा भोग.. रोग तरास देतो. त्यानंच असं काही बाही घडतं." मम्मी सांगत होती.
 निर्मला पुण्याला जाऊनही सहासात वर्ष होऊन गेली आहेत. गेल्या दहा अकरा वर्षात सुमारे पावणेदोनशे निराधार, एकाकी, गरजू स्त्रिया दिलासाघरात राहून गेल्या. त्यांच्या कहाण्या, तिथेच आणि त्यांच्यातीलच एक होऊन राहाणाऱ्या मम्मीच्या ओठावर असतात. पण त्यातील काहींची आठवण मात्र तिला नेहमीच येत राहाते. सतावीत राहाते. निर्मलाची कहाणी अशीच. सतत आठवत राहाणारी. तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न समोर खडे करणारी. कहाणी आठदहा वर्षांपूर्वीची. पण आजही डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहाते.
 …"भाभी, निर्मला मातोळेला आपल्या दिलासाघरात राहायला यायचेय. तिने मांडव्याच्या बालवाडीताईसोबत निरोप पाठवलाय.
 आठवते ना निर्मल? ती औशाची केस. महाराष्ट्रभर गाजलेली. मग काय पाठवू निरोप?" पलीकडून दामिनी, आमच्या मनस्विनी महिला प्रकल्पातील कार्यकर्ती. जिला आम्ही संवादिनी असे म्हणतो, ती विचारीत होती. खरे तर हा प्रश्न विचारण्याची गरज नव्हती. परंतु आपल्या कोणत्याही कामात, ज्येष्ठ 'व्यक्तिमत्त्वा'ची बाब अगदी आतून नको तितकी आणि नकळत मिसळलेली असते. आपण हा उपचार पाळतो. मग त्याचीही सक्य होऊन जाते. तो न पाळणे गंभीर बाब ठरते.
 "अगं, तिला प्रवेश देऊन फोन करायचास. गरजू स्त्रीला अर्ध्या रात्री आधार देऊन दिलासा देणारे घर म्हणतो ना आपण? मग?" माझी ही वाक्ये सुद्धा आता 'ध्वनिमुद्रित' झाल्यासारखी तोंडातून बाहेर पडतात. मी फोन ठेवला आणि माझ्या मनात निर्मलेचा कोरा चेहरा आकारू लागला.

 ....डोक्यावरचे केस पूर्णपणे कापून गोटा केलेला. त्यावर फोड आलेले. खोबणीत जाऊन बसलेल्या डोळ्यातली विलक्षण जिवंत पण बिथरलेली नजर. निर्मलेला पाहाण्यासाठी गावांतल्या अर्ध्याहून अधिक महिला वैद्यकीच महाविद्यालयाच्या दवाखान्यात गर्दी करून गेल्या होत्या. महाराष्ट्रातील प्रत्येक वर्तमानपत्रात, तिच्यावर लादलेल्या मृत्यूसमान तुरुंगांची,... सहा महिन्यांच्या

६६
तिच्या डायरीची पाने