पान:तिच्या डायरीची पाने.pdf/४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


गीताईचे भागवत....


 "मी मायच्या पोटात होते तवा अण्णांच्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, घरी भागवत बसवलं होतं. मी पाचवी लेक. पोरगं झालं तर भागवत नाव ठिवनार होते. पन समाप्तीच्या दिवशीच मायनं घाई केली नि मी झाले. पुन्हा पोरगीच! पन पोथी वाचणारा बामण बरा असावा. त्याने समजून घातली म्हणे, की पांच लेकीचं कन्यादान केलं की स्वर्गातली सीट पक्की होते. देवांनीच पाचवी लेक धाडलीय. गीता नाव ठेवा असंही सांगितलं. म्हणून हे असं सुंदर नाव मिळालं. पन म्हणतात नां? नाव सोनाबाई आन् हाती कथलाचा वाळा नाही. नांव गीता पन अख्खा जन्म रडगाणी गान्यात चाललाया." गीता बोलायला लागली की किती बोलू नि किती नको असे होऊन जाई. लहानपणापासून बोल वर नेमीच अळीमिळी गुपचिळी' चा कायदा होता. एकतर ही पाचवी. त्यातून रीतीरिवाजाच्या घडीबंद घरातली लेक. वडिलांना पंधरा एकर रान होतं. दोन विहिरी होत्या. पण पदरातल्या पाच पोरींचा उताडा घराबाहेर काढायचा ही काय चुटकी वाजवण्यासारखी सोपी बाब होती?

 "भाभी, आजकाल चपराशाची नोकरी मिळवायची तरी तीस-तीस हजार मोजावे लागतात. नोकरीवाला नवरा शोधायचा तर लाखाची तयारी हवी. ती कशी आमच्या अण्णांना पेलणार? मोठे दाजी आक्कीपरीस चौदा वरसांनी वडील आहेत. त्याची पहिली बायकू तिसऱ्या बाळंतपणात खर्चली. तिच्यावर आक्कीला दिली. रुपया नि नारळावर लग्न लागलं. दाजींचा बारदाना मोठा. पन्नास एकरात तर नुसती बागायत. आक्की पहिलीची तीन नि स्वतःची चार अशा सात लेकरांना वाढवतेय. तिसरी माया. लईच देखणी होती. म्हणून शेजारगावच्या हायस्कुलातील चपराशाने मागून केली. आक्कीनंतरची शांतू. लई कामसू नि

गीता
३७