पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रचला होता पण त्यावर दगड व विटा ... वा फेरोक्रेटच्या भिंती किंवा गोल घुमटाकार न हलणारी "इमारत" रचणारे रचनाकार भेटले का? त्याचे भान कुणाकुणाला होते? एक बरिक खरे. सरकारने जाहीर केले की नवे घर पतीपत्नीच्या नांवे होणार. चांगली बाब. क्रांतीकारी निर्णय वगैरे घेतला. तो पारही पाडला. पण रेबे चिंचोलीतली मैत्रिण विचारत होती,"ताई … जिथं भिंतीला तडे गेले, त्या गावांनापन सरकार घरामागं पंधरा हजार रुपये दिले, त्ये पैसे बी दोगांच्या नावानं द्यावेला हवे होते. अव घर तर बाईलाच मांडावं लागतया. ते आडोशाला असेल, नाय तर उनात असेल. पुरुषांचं कसं आसतया, बाराला येऊन तुकडा खायचा की निघाले बाहीर. आता बगा पैसा यायला लागला तवा पासून पिनाऱ्यांचं पीक लई जोरात आलया. सारा पैसा दारूत पार झाला. बायांच्या नावानं बँकेत टाकला असता तर तिला हानमार करून तिची सही नाय तर अंगठा घेईस्तो तरी टिकला असता!!" तिला उत्तर मिळाले का?
 ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या एक बाई आणि त्यांच्या दोन मैत्रिणी भेटल्या. एकूण पाचजणी निवडून आल्या होत्या. पैकी या तिघीजणी. बाईनी पन्नाशी पार केली आहे. अनुभवी, गेल्या १५ वर्षापासून सातत्याने निवडून येणाऱ्या. या एस. एस. सी. पास. इतर दोधी ७ वी झालेल्या. "तातडीची मिटींग" आहे म्हणून निरोप आल्याने या निघाल्या. पंचायतीत येऊन पाहतात तर कुलुप. तेवढ्यात आम्ही दिसलो म्हणून आमच्याशी बोलायला आल्या. पंचायत राज्यात स्त्रियांना तीस टक्के जागा दिल्या तरी, प्रत्यक्ष सहभाग घेऊ देत नाहीत ही त्यांची तक्रार होती. "भूकंपग्रस्त भागाच्या अडचणी सांगणारी शिष्ट मंडळे मुंबईला जातात. त्यात स्त्रिया किती असतात? ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळात आम्हा बायकांना स्थान का नाही?" आणि त्याला जोडून एक खास सवाल "यांनी नाही नेलं तर ते समजतं हो. त्यांना ती सवयच नाही. पण कायदा नि धोरण करणाऱ्या मंत्र्यांनी तरी विचारावं की, शिष्ट मंडळात बाया कां नाहीत म्हणून? प्रश्न विचारणाऱ्या, बोलणाऱ्या महिला कुणाला चालतात?"

 भुकंप होऊन सहा वर्षे झाली. लोक; विशेषतः स्त्रिया मानसिक दृष्या सावरल्या का? भूकंपग्रस्त भागातली एक सुजाण, कर्तबगार, राजकारणी, तळातून काम करणारी महिला तिच्याशी मोकळेपणी बोलण्याची संधी ही पर्वणीच.

११६
तिच्या डायरीची पाने