पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतात. एरवी दबून बोलणाऱ्या या बाया ही कणगी इथल्या पेक्षा तिथेच ठेवणे कसे योग्य आहे, हे चांगल्या रितीने आणि ठणकावून पटवून देत असतात. या लक्ष्म्यांचा विचार … त्यांच्या आशा अपेक्षांची नोंद या परिसरातली घरे बांधतांना घेतली कां? निदान घ्यायला हवी होती. त्या वेळी या परिसरात भेटलेल्या एकदोघींची घरांबद्दलची प्रतिक्रिया अशी होती. … "शेतातून आलेला माल ठेवाया चांगली सोय झाली. शिमिटाच्या भिती हाईत. उंदरं बी कमी येत्याला. त्या इतकुशा खोलीत चूल तरी कशी मांडावी वो? चूल म्हटली की धूर व्हणारच. भिती काळ्या व्हनार. त्या शेणान कशा सारवता येतील? तवा चूल तर भाईरच मांडली आमी आन आमचा पोरवडा … नि आमी दोघं त्या इलूशा खोलीत कसे झोपणार? गुरं बांधाया जागा न्हाई. कुनी आलं गेल तर त्याला कुठं बसवावं? वगैरे …"
 प्रत्येक गावाचे एक वेगळेपण असते. आगळी मांडणी असते. त्यातला गोडवा हरवलाय. वेशी बाहेरची घरे …? आता वेसच उध्वस्त झालीय. नव्या वस्तीत "दिसणारी" वेस नाही. पण "मनातली वेस" कोसळती आहे का? भूकंपानंतर उभारलेल्या तात्पुरत्या वस्तीत ज्याला जी जागा वा खोली मिळाली तिथे त्याने संसार थाटला मुसलमानाशेजारी हिंदू ब्राम्हणांचं घर नि शिवलिंगधारी लिंगायताच्या घराशेजारी रोज अंड्याचा खुराक लागणाऱ्या एखाद्याचं घर, अशी सरमिसळ होती. ती सालभर निभली. नव्या घरात जातांना या "वेशी" चं काय झालं? रितीप्रमाणे त्या उभ्या राहिल्याच.
 "ताई, काळ्या आईला लेकरं सारखीच. मालदाराची गढी कोसळून मानसं गडप झाली तशी मजुराच्या घराची भिंत पडून त्याची बी लेकरं मेली. वेशीबाहीर रहानारी बी खर्चली. नि आत रहाणारी बी. मागल्या बापजाद्यांनी डोकीत बशीवलं ते आजवर पाळत आलोय. जलम सारखा .. मरन सारख. सुखाच्या घडीला जात नि पात. दुखात कसली आली जात? समदे जिमनीवरच हुबे हाईत याचा खुलासा दुखातच मिळतो.

 पन आता नव्या घरात रहाया जायचं तवा पुन्ना जुनी रीत पाळावीच लागणार. ती कशी वलांडता येईल?" मंगरुळच्या एका म्हाताऱ्या आजीचे हे विचार. अर्थात ते सर्वांचेच. ते बदलण्यासाठी लागणारा पाया भूकंपाने नकळत

हिबाळून टाकलेल्या लक्ष्म्या
११५