पान:तिच्या डायरीची पाने.pdf/११९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भूकंप होऊन काही वर्षे उलटून गेली आहेत. शेकडो सिमेंटी घरांचे ठिपके माणसांची वाट पहात उभे होते. या घरांना कुरवाळण्याचे धाडस .. बळ त्यावेळी माणसांत नव्हते. पण ती घरे आता माणसांनी गलजबजू लागली आहेत. तरीही हरेक सिमेंटी घरासमोर आहे पत्रे नाहीतर झावळांची झोपडी. वाज .. मातीची चूल .. पाण्याचा रांजण आणि, भिरभिरती माणसे. मग त्या कोऱ्या करकरीत घरात रहाते कोण? गेल्या चार वर्षात जमा झालेल्या सामानाचे ते कोठीघर झाले आहे.
 "अ" संस्थेने अमुक इतकी अनाथ मुले दत्तक घेतली. "ब" संस्थेने तितकी अनाथ मुले नेली. "क" संस्थेने एवढी.. "ड" संस्थेने तेवढी… अशा अ ते ज्ञ पर्यन्त संस्था. नेमकी अनाथ मुले किती? "अनाथ" शब्दाची व्याप्ती विशाल झाली आहे. एकाकी पालकांची मुलेही अनाथच. धरणीनेच कूस बदलली. सारा परिसरच अनाथ केलाय. म्हणजे हरेक मूल अनाथच की!!! पण आजही पांच ते दहा वर्षांची कितीतरी मुले ढुंगणावर फाटलेली चड्डी नि चिठ्या लावलेला ढगळ सदरा पांघरून जनावरांमागे हिंडणारी, दिसतातच. मग त्या अनाथ मुलांचे नेमके झाले काय?
 वर्ष दोन वर्षात आठशे विधूरांचे विवाह झाले म्हणे. वयाची पुछताछ नस्से. पण एकही विधवा - विवाह नाही. एक सन्माननीय अपवाद. विधुर, वय वर्षे पंचावन्न (किंवा थोडा पुढे) नि पत्नी परित्यक्ता. ( वय वर्षे बावीस ते चोवीस). "हेही नसे थोडके." असे म्हणणारे परिवर्तनवादी 'क्रांतीवीर'!!!
 तर दिवस भरारा पळताहेत. या परिसरातील स्त्रिया किती हलल्या आहेत? विधवांच्या उरातली जखम अजूनही वहातेय का? परित्यक्तांचे वेगळेच दुःख. पुन्हा एकदा लक्ष्यांचा सर्वात मोठा सण अंगणात येऊन उभा आहे. या वर्षी त्यांचे स्वागत करताहेत का घरातल्या लक्ष्म्या? लक्ष्मी कुणाला म्हणायचे? अनेक प्रश्न … अनेक भावना.

 कितीही म्हंटले तरी "घर" शेवटी बाईचेच असते. ते मांडायचे कसे हा प्रांत तिचाच. अगदी आठवडी पगारा सारख्या मार खाणाऱ्या … त्या माराच्या रडून कहाण्या सांगणाऱ्या आमच्या महिला, चूल या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात कशी नि कां मांडली, इथला पसारा तिकडे कसा छान दिसतो हे उत्साहाने सांगत

११४
तिच्या डायरीची पाने