पान:तरंग अंतरंग.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बन की तो फ्रेंच माणूस. चित्रपटात तो श्रीदेवीसाठी काय करतो, तर तिचं सगळं म्हणणं टीका न करता ऐकून घेतो. तिचं कौतुक करतो. ती किती सुंदर आहे, हुशार आहे ते तिलाच पटवून देतो. तिला स्वतःकडे नव्याने बघायला लावतो. मग हे सगळं तुझं तू सुद्धा करू शकतेस ना?" पु. शि. रेगेंच्या 'सावित्री' या पुस्तकातली राजम्मा चिमुकल्या सावूला 'लच्छी आणि मोर' ही गोष्ट सांगते. त्यातल्या छोट्या लच्छीला मोर सतत आपल्या अंगणात नाचावा, असं वाटत असतं. पण मोर स्वच्छंदी असतो. तो अट घालतो की, लच्छीच्या अंगणात मोर नाचायला हवा असेल, तर लच्छीने स्वतः आधी आनंदाने नाचायला हवं. तरच मोर येईल. लच्छी मग आनंदी राहण्याचा प्रयत्न करते. कारण तिला तो मोर हवा असतो. पण मोर कधी येणार, ते काही सांगता येत नाही. शेवटी मोराची वाट बघणं, हे कारणच गळून पडतं आणि लच्छी स्वतःच मोर बनून आनंदविभोर होते. आपल्याला मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं. आपल्याला जे-जे हवं ते आपणच व्हायचं. हा त्या गोष्टीतला गाभा. तो एकदा समजला की, मग 'आत्मभान' आपसूकच येतं. स्त्रियांच्या बाबतीत तर हे कळणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आयुष्याच्या एका वळणावर बऱ्याच बायका एकाकी पडत जातात. विशेषतः घर-संसारासाठी म्हणून करिअर सोडणाऱ्या किंवा नोकरी-उद्योग केला तरी करिअर मंद आंचेवर ठेवणाऱ्या स्त्रियांना चाळिशीच्या आसपास एकदम रिकामपण खायला उठतं. नवरा त्याच्या कामात प्रगती करत असतो, मुलं त्यांच्या व्यापात गढून जातात. संप्रेरकांमुळे शरीरातही बरेच बदल घडत असतात आणि मग उगाचच चिडचिड झाल्यासारखं वाटतं. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे डोळे भरून येतात. घरातलं कुणी आपल्याला समजूनच घेत नाही, असं वाटतं. त्या सगळ्या भावनांच्या हिंदोळ्यावर सतत झुलत असताना स्वतःवरचं लक्ष कमी-कमी होत जातं. अशा वेळी मग मन एक तर सतत भूतकाळातल्या चुकांचा धांडोळा घेत राहतं. 'छे, मी इतक्या लवकर लग्नच करायला नको होतं,' इथंपासून ते 'उगाच प्रमोशन नाकारलं, बदलीच्या भीतीनं ती बढ़ती घेतली असती तर आज कुठल्या कुठे पोचले असते,' इथपासूनच्या आयुष्यातल्या सगळ्या खऱ्या... काल्पनिक हुकलेल्या संधींची उजळणी होते. त्यातून पदरी काहीच पडत नाही; फक्त नैराश्य वाढतं. आपल्याच निर्णयक्षमतेवरचा स्त्रियांचा विश्वास उडतो. मग आहे ती परिस्थिती अजूनच वाईट भासायला लागते. भूतकाळात सतत वावरल्याने नैराश्य पदरी येतं, तर सतत भविष्याची चिंता केली तर छातीत धडधड. उगाच भीती वाटणे, रात्री झोप न लागणे, कसल्या तरी अनामिक भीतीच्या दडपणाखाली सतत वावरणे, अशा तक्रारी सुरू होतात. मुलांच्या शिक्षणाचं पुढे काय होईल, घराचं कर्ज कसं फिटेल, घरी कुणाला आजार तरंग अंतरंग / ९६