________________
"तुम्ही अठरा-वीस तासांच्या प्रवासाने दमलेले आहात, तेव्हा बाहेर 'सचैल ' स्नान करून या. थोडा फलाहार करा आणि विश्रांती घ्या; मग आपण निवांत बोलू, " असे सांगून स्वतः डोळे मिटून एकाद्या पुतळ्यासारखे साधनेत मग्न झाले. या दिव्य पुरुषाला माझे भूत, भविष्य सारेच कसे माहीत ? मी बाहेरच्या डोणीतून पाणी घेऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे 'सचैल स्नान केले. विशेष म्हणजे मगाशी थंडगार वाटणारे पाणी मला कोमट भासले. पंचाने अंग पुसून अगोदरचे कपडे पिळून बाजूच्या फांदीवर वाळत टाकून आत गेलो. एका पसरट पानावर मला अनोळखी अशी चार-पाच फळे, गाजर - रताळेसदृश दोन-तीन मुळे आणि द्रोणात प्यायचे स्वच्छ पाणी ठेवले होते. त्यांना आता आपण 'स्वामी' म्हणू. ते ध्यानस्थच होते. मला त्यांनी फराळ करून विश्रांती घ्यायची 'आज्ञा' अगोदरच दिली होती. त्यामुळे मी काल रात्रीनंतर काहीच खाल्लेले नसल्याने पटकन् 'आज्ञा' तंतोतंत पाळली. नंतर बघता-बघता झोपून गेलो, एकदम गाढ निर्धास्त ! जाग आली, तेव्हा जवळजवळ संध्याकाळ झाली असावी. ताडकन् उठून बाहेर जाऊन चूळ भरली. चेहऱ्यावर पाणी शिडकले, आत आलो तर ना स्वामींच्या बैठकीत काही बदल झाला होता, ना ध्यान-धारणेत ! मीही त्यांच्यासमोर ध्यानस्थ बसलो. कसलेही भान उरले नाही! हा अनुभव नवाच होता. किती वेळ 'त्या' अवस्थेत गेलो, माहीत नाही. बघता-बघता मिटल्या डोळ्यांसमोर स्वच्छ, निळ्या, अफाट पसरलेल्या आकाशात अनेक ग्रह-गोलकांची अतिशय हळुवार पण सहजतेने हालचाल सुरू होती आणि 'त्या' पोकळीमध्ये संचार करणाऱ्या एकेक ग्रहगोलकाची इत्थंभूत माहिती कानावर स्पष्टपणे नोंदवली जात होती. बघता-बघता पूर्ण ब्रह्मांड नजरेनं पालथं घातलं. हे अफाट, अचाट व्यापक अगोचर बाह्यविश्व इतक्या जवळून, त्याचा एक भाग बनूनच मी एकटक पाहत होतो. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेल्या विश्वदर्शनाची मला आठवण झाली. एका क्षणी जाण झाली, तेव्हा त्या 'सत्पुरुषा'चा हात माझ्या डोक्यावर हळुवार फिरत होता. डोळ्यांसमोर प्रसन्न मुद्रेचे स्वामीजी आणि त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावरचे स्मितहास्य एवढेच दृश्य स्वरूप राहिले. बाहेर घनदाट अंधार ! बहुधा मध्यरात्रही उलटून गेली असावी. कसलाही थकवा वाटत नव्हता; उलट तरतरी नसानसांत सळसळत होती. मी स्वामीजींच्या पायावर अतिशय नम्रतेने डोके टेकले. यावर स्वामीजी म्हणाले, "आता विचार तुला काय विचारायचे होते ते?" मी मात्र मूकपणे त्यांच्याकडे पाहतच बसलो. तेच म्हणाले, "हे सामर्थ्य मिळवायला वीस-एक वर्षे तरी गेली असतील. तुमच्या जगात वीस वर्षे फुकट गेली, म्हटले तरी चालेल; पण शेवटी समाधान; अगदी आत्म्याचे समाधान, आत्म्याचा शोध, हवा असेल तर हाच मार्ग आहे. तुला हीच माहिती हवी होती ना !" मी आश्चर्यचकित झालो. "हे सारे पूर्वजन्मीचे संचित ! तुझे अर्धवट राहिलेले स्वप्न ! 'ज्ञानेश्वरी' पंधराव्या वर्षी लिहिणे, ही अशीच पूर्वजन्मीच्या राहिलेल्या कर्माची पूर्तता; नाही तर या वयात माणसाच्या बुद्धीची तरंग अंतरंग / १८