पान:तरंग अंतरंग.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"परत केव्हा येणार, " असे विचारत मला वाकून नमस्कार करून म्हणायचे, "शिवपार्वती कुटुंबाला आमचा दंडवत सांगा." खरं म्हणाल तर शिवजींचं माहीत नाही, पण अनिल नारायण कुलकर्णी हा 'महापुरुष' परत भेटला नाही तर नमस्कार करायचा राहिला अशी खंत मनात राहू नये. असाच त्यांचा विचार असावा. असा माझा एक आपला अंदाज. मी 'ईश्वरी लीला' ची स्पष्ट कल्पना असल्याने त्यांना सांगू लागलो. परत आलो तर वारी सफल झाली समजा; आणि न आल्यास शिवपार्वतीमाईंनी 'कैलासवासी' असे प्रशस्तिपत्र देऊन तिथेच ठेवून घेतले, असे समजावे. माझे हे उत्तर 'कैलासवासी' सहाही जणांना खूपच मनोरंजक वाटल्याने, सारेच गालातल्या गालात हसले. (याला अपवाद नंदी, तो गालातल्या गालात हंबरला आणि नाग नाकाच्या शेंड्यावरून फुत्कारला. ) बालपणापासूनच्या माझ्या अत्यंत प्रिय असलेल्या दैवताच्या म्हणजे गणपतीबाप्पांच्या पिताश्रींनाच मी डायरेक्ट हसण्याचे कारण विचारले. मी खूपच आग्रह केल्यावर ते म्हणाले, 'तुझ्या या विनोदावर खूष होऊन मी विचार बदलला ; नाही तर..." आणि म्हणून मित्रहो, मी 'कैलासवासी' न होता परत आलो. तरी अधून-मधून कुणी कैलास यात्रेला जातंय म्हटलं की, मन उचंबळून येतं हो. पुन्हा जावंसं वाटतं. खूप सुंदर रमणीय, भव्य-दिव्य आहे! आपलं मनच विशाल कैलास पर्वत होऊन जातं. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे घर पाहण्याची संधी मिळाली तर कधीही सोडू नका... पण सफल वारी करून परत यायचं.

तरंग अंतरंग / ११२