पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 माणसचं यंत्रावर अवलंबून राहणं वाढत आहे. तसे नव-नवे प्रश्न निर्माण होत आहेत. माणसाची जीवनशैलीच बदलत निघाली आहे. यंत्रामुळे माणसाची गती वाढते आहे. या गतीने अनेक गुंते निर्माण होत आहेत. माणसास माणूस म्हणून वागण्यास, व्यवहार करण्यास वेळ राहिलेला नाही. भौतिक सुखामागे धावणाऱ्या माणसाने यंत्र चालवणारी पण यंत्रे तयार केलीत. त्यामुळे एक काळ असा येईल की जग यंत्रांचं असेल. तिथं माणूस असणार नाही.
 आपली आजची घरं, व्यवहार, समाज पाहता अॅसिमोव्हनं २०० वर्षांनंतरच्या मनुष्य समाजाचं कल्पनेनं चित्रित केलेलं जग अशक्य वाटत नाही. आज माणसापुढे यंत्राने दुहेरी संवेदनशीलतेचं आव्हान उभं केलं आहे. यंत्राच्या तंत्रावर नाचणाऱ्या माणसाला माणुसकीचा मंत्रही जपून राहावा वाटतो आहे. मिक्सरमध्ये वाटून पानात वाढलेल्या कैरी डाळीला आईने पाट्यावर वाटलेल्या कैरी डाळीची चव नसल्याचं शल्य जसं अस्वस्थ करतं तसं घरातील उखळ पांढरं होण्यामुळे उखळच न राहणं त्याला सलत राहतं. माठ, फिरकीचा तांब्या, पानाचा डबा, रवी, पाट, चौरंग, झोपाळा, चूल, शेगडी, बंब यांच्या जाण्यानं आपण घरात न राहता हॉटेलमध्ये राहतोय याचा फील वाढतो आहे. घरात माणसांचं येणं-जाणं कमी होणं, मामाचा गाव तुटणं, आजोळ न राहणं यातून यंत्र होणाऱ्या माणसापुढे माणूसपणाच्या संवेदना, खुणा जपण्याचं आव्हान उभं राहतं आहे.

***

जाणिवांची आरास/५0