Jump to content

पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपल्या जीवनात नेमके हेच घडते. आयुष्यात आलेले संकट या काळ्या ठिपक्यासारखे असते आणि त्यावेळी मोठ्या पांढऱ्या कागदाप्रमाणे आपल्याकडे असलेले चांगले गुण आणि सुखाची साधने आपण विसरून जातो. कदाचित आपल्या आयुष्यात या पांढऱ्या कागदावर एकापेक्षा जास्त काळे ठिपके असतील. पण लक्षात ठेवायला हवे की, आयुष्याच्या या पांढऱ्या कागदावर संकटांच्या काळ्या ठिपक्यांचे प्रमाण, क्षेत्रफळ खूपच कमी असते. काळे ठिपके सोडले तर, पांढरा भाग म्हणजे आपली शक्ती आपल्याकडे असते. त्याचा विचार करावा. त्याचा वापर करावा.
 आपल्या आयुष्यात वाईट काय घडले ? संकटे किती आली? कोणती आली? यांचा विचार करीत बसू नये. भूतकाळातील अपयशांचा विचारही करू नये. आपल्याला संधी कोणत्या मिळाल्या, आपण कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या याचा हिशोब करावा. त्यामुळे आपल्याला आपली ताकद कळेल. ताकद येईल आणि तणावमुक्त होता येईल.
 संकटामुळे दोनच गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे खंबीरपणे त्यावर आपण मात केली तर संकटच नाहीसे होते. याउलट खचून गेलेली, हतबल झालेली, केवळ अस्वस्थ होऊन 'स्वस्थ' बसलेली व्यक्ती संकटांची शिकार होते. कधी-कधी ती व्यक्तीच संपते. आपल्याला जर संकटावर मात करायची असेल, संकटालाच शिकार बनवायचे असेल तर काय केले पाहिजे ?
 संकटाविषयीच्या भीतीमुळे चिंता निर्माण होते. काळजी निर्माण होते. चिंता आणि काळजी या शब्दांच्या मागोमाग त्रागा आणि वैताग हे येतात. त्यातून शारीरिक नुकसान होते. अशा ताणतणावांमुळे रक्तदाब वाढतो, हृदयावर ताण येतो, इतर व्याधींना आमंत्रण मिळते. म्हणून संकटांकडे शांतपणे पाहावे. संकटांवर प्रेम करावे आणि त्यांना हाताळावे. म्हणजे आपले शारीरिक आणि मानसिक नुकसान टळेल. म्हणून संकट आले तरी वृत्ती प्रसन्न ठेवावी; मन खंबीर करावे; संकटाचा सर्व बाजूंनी विचार करावा. संकटाचे गांभीर्य जोखून आपले सर्व सामर्थ्य, बळ एकवटून संकटावर हल्ला करावा.

आयुष्यात संकटे यावीत । १५