पान:चित्रा नि चारू.djvu/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "....त्या कलेक्टरला जा शिकव. दे दोन थोबाडीत त्या लेकाच्या. कलेक्टरची खुर्ची मिळाली म्हणजे का अक्कल येते ? सहानुभूतीने ज्ञान ‘मिळते. नम्रपणाने ज्ञान मिळते.'

 अशी बळवंतरावांची बडबड अखंड चालू असायची. कधीकधी मुके बसले, की अखंड मौन. एक शब्द मग बोलत नसत.

 "आई, माझ्या मनात येते ते सांगू ?" भोजूने सीताबाईस विचारले.

 "काय भोजू ? "

 "आपण यांना इस्पितळात ठेवले तर? तेथे वेड जाते. काही उपाय करतात. आपण येथून सारीच जाऊ. तिकडेच राहू. ठाण्याला म्हणतात, आहे असा दवाखाना, मी येऊ का चौकशी करून? "

 " भोजू, तू सांगशील तसे. तुझ्यावर त्यांचा लोभ होता. नाथांकडे श्रीखंड्या तसा जणू तू आमच्याकडे आलास. तुझाच आता आधार आहे हो. माहेरी तरी माझे सख्खे कोण आहे ? एकदा येऊन गेले. पुन्हा कोणी आले का ? जाऊ दे. आपले नशीब नि आपण. परंतु त्या इस्पितळात खर्च द्यावा लागेल. मुलांच्या विद्या ! कसे करायचे ! ह्या पाटल्या विकाव्या. ही कुडी विकावी."

 " आई, तुम्ही काळजी नका करू. एवढ्यात अंगावरचे विकू नका. शेवटी आलीच वेळ तर विकू. मी ठाण्यास चौकशी करून येतो. येतो जाऊन."

 "ये "

 आणि भोजू गेला. ठाण्यास येऊन त्याने सर्व चौकशी केली. त्याने बळवंतरावांसंबंधी सारी हकीगत सांगितली. डॉक्टर म्हणाले, * घेऊन या, गुण येईल." भोजूने तेथे राहायला एक चांगले घरही याहिले. नौपाड्याच्या दत्तमंदिरात खोल्या रिकाम्या होत्या. तेथून इस्पितळही जवळ होते. सीताबाईंना देवळाचाही आधार होईल. ते दत्तमंदिर सुंदर होते. केवढे थोरले आवार. बाग होती. तेथे मोफत वाचनालय होते. मोफत दवाखाना होता. रम्य, शांत ठिकाण. मुलांना शाळाही फार लांब नव्हती. तेथे सारी व्यवस्था करून भोजू आपल्या गावी गेला. त्याने आपले घरदार, शेतीवाडी विकली आणि जे काय

चित्राच्या वडिलांना वेड लागते * ५७