पान:चित्रा नि चारू.djvu/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भोजूने सारी तयारी केली. तो सामान घेऊन स्टेशनवर गेला. तिकीट काढून थांबला होता. रावसाहेब आले. भोजूने तिकीट दिले.

 "भोजू, सांभाळ हो सर्वांना. मी पत्र पाठवीनच. हुशारीने राहा."

 " होय साहेब. "

 गाडी सुटली व भोजू घरी आला. बळवंतराव गोडगावला गेले. अद्याप जहागीरदार घरी आले नव्हते. चारू घर सोडून गेलाच होता.

 "काय हो, काय आहे हकीगत माझ्या मुलीची ? सारे सांगा तरी एकदा." बळवंतराव दुःखाने म्हणाले.

 "माझ्या तोंडाने सांगवत नाही. पहिल्यापासून माझे मत होते, की तुमची मुलगी नको म्हणून. परंतु या सर्वांचा हट्ट. मीसुद्धा शेवटी तिच्यावर प्रेम करू लागल्ये. तिला माझ्याबरोबर नेली. म्हटले, देवीला नवस करू. पुत्र होईल. परंतु तिथे कोणाबरोबर पळून गेली. तोंडाला काळोखी फासून गेली. आमची मान खाली. सारे लोक टिंगल करीत आहेत. हा चारूही कोठे गेला. तुमच्या मुलीने सारा सत्यनाश केला आमचा. अब्रू गेली. मुलगाही कोठे गेला, पत्ता नाही. एकुलता आमचा मुलगा." असे म्हणून ती दुष्ट सासू खोटे खोटे रडू लागली.

 "तुम्ही काही म्हणा. चित्रा असे करणार नाही, कोणी तरी तिला पळवले असेल. असतात अशा टोळ्या. माझी चित्रा देवता आहे. तारणारी देवता. ती सत्यनाश करणारी नसून सर्वांचे मंगल करणारी आहे. ती जन्माला आली व मी मामलेदार झालो. तिच्या पूर्वी झालेली सारी मुले मेली. परंतु ती जगली आणि तिच्या पाठीवरचीही जगली. आमच्या घरात संतती, संपत्ती, आनंद तिच्यामुळे आला. ती प्रेमळ व निर्मळ आहे.भोळी आहे. तिला कोणाची शंका येत नाही. सर्वांवर प्रेम करील. सर्वांना जवळचे देईल. सापडेल, कोठे तरी सापडेल माझी चित्रा."

 असे म्हणून बळवंतराव बाहेर बैठकीच्या जागी गेले. जेवण करून गोडगाव सोडून तेही चित्रांच्या शोधार्थं सर्वत्र हिंडू लागले. सापडेल का चित्रा ?

५२ * चित्रा नि चारू