"जपा हो. " बळवंतराव म्हणाले.
"ताई, चाललो." भावंडे म्हणाली.
"जप हो." सीताबाई स्फुदत म्हणाल्या.
चित्राला बोलवत नव्हते. सुटली गाडी. चित्रा व चारू परतली. गाडी घेऊन ती आली होती. बसली दोघे घोड्याच्या गाडीत व निघाली. गडी हाकलीत होता. चारू व चित्रा आत होती. चित्राच्या डोळ्यात राहून राहून पाणी येत होते.
"चित्रा, उगी. रडू नको. मी आहे ना ? "
" होय हो चारू. परंतु वाईट वाटते हो.”
"वाईट वाटायचेच. "
गाडी घरी आली नाही तो सासूची गर्जना सुरू !
म्हटलं येता की नाही घरी, की राजाराणी जातात पळून. किती हा उशीर ! चारू, तू अगदी नंदीबैल होणार की काय ? ती नाचवील तसा तू नाचतोस. सिनेमा पाहून आला असाल ? उगीच नाही इतका उशीर झाला. शहरातल्या सवयी, सिनेमे हवेत आणि सिनेमातल्यासारखे उद्या करालसुद्धा."
"आई, अग गाडीची वेळ बदलली आहे. गाडो सुटली नि तश्शी परत आलो. का उगीच बोलतेस ? आता आम्ही का कुकुली बाळे ? ‘पाहिला सिनेमा म्हणजे का पाप झाले ? तुसुद्धा मधूनमधून पाहातेस."
"परंतु देवाधर्माचे आम्ही पाहातो."
"आम्ही वाटते वाईट असतात तेच पाहातो ? काही तरी आपले बोलतेस."
“ बरे हो, नाही बोलणार. तुम्ही आता मोठी झालीत. कोण बोलणार तुम्हाला. वाटेल तशी नाचा. उद्या तोंडाला काळे फासू नका म्हणजे झाले.”
असे दिवस जात होते. आणि एकदा चारूला कोठेतरी लांब जायचे होते. महत्त्वाचे काम होते.
"चारू, जाशील ना तु ?" बापाने विचारले.
" होय बाबा, हवे ना जायला ?"