पान:चित्रा नि चारू.djvu/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चि त्रे चे
ल ग्न

♣ * * * * * * ♣








 निर्मळपूर तालुक्यात गोडगाव म्हणून एक खेडे होते. गोडगावला एक मोठे जहागीरदार होते. त्यांच्या मुलाचे नाव चारू. एकुलता एक मुलगा. फारच देखणा होता तो मुलगा, चारू जसा दिसायला सुरेख होता, तसाच स्वभावानेही चांगला होता. सारा गाव त्याच्यावर प्रेम करी.

 चारूचे मराठी शिक्षण संपले. त्याने इंग्रजी शिक्षणही घेतले. थोडे दिवस कॉलेजमध्येही तो होता. परंतु १९३० सालच्या चळवळीत त्याने कॉलेज सोडले, तो चळवळीत भाग घेणार होता, परंतु आईबापांच्या सांगण्यामुळे तो तुरुंगात गेला नाही.

 तो तेव्हापासून घरीच असे. घरीच वाची. घरचा एक मळा होता. त्या मळ्यात काम करी. शेतक-यांवर तो फार लोभ करी. शेतक-यांची बाजू घेऊन भांडे.

 बळवंतरावांच्या कानावर चारूची गोष्ट आल्याशिवाय राहिली नाही. ते एकदा गोडगावला मुद्दाम गेले होते, जहागीरदारांकडेच उतरले होते. मेजवानी झाली. चारूला पाहून त्यांना आनंद झाला.

 " तुम्ही सत्याग्रह संपल्यावर पुन्हा का नाही गेलात कॉलेजात ? शिक्षण पुरे झाले असते." बळवंतरावांनी विचारले.

 "शिक्षण म्हणजे ज्ञानच ना ? ते घरी बसूनही मला मिळवता येईल. मला नोकरीचोकरी करायची नाही. घरीच बरे. मळ्यात खपावे. शेतक-यांत असावे. त्यांची बाजू घ्यावी. हाच माझा आनंद." चारू

म्हणाला

१४ * चित्रा नि चारू